नवी दिल्ली/प्रतिनिधी
उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरीमध्ये झालेल्या हिंसाचाराचे देशभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. लखीमपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. या हिंसाचारासंदर्भात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणावर आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांनी युपी सरकारला फटकारले आहे. या दरम्यान, सरन्यायाधीशांनी हत्या प्रकरणातील आरोपीला वेगळी वागणूक का दिली जात आहे, असा प्रश्न यूपी सरकारवर उपस्थित केला. तर, नोटीस बजावल्याबद्दल हरीश साळवे यांनी न्यायालयात विचारले असता “आम्ही नोटीस जारी केली नव्हती. आम्ही स्टेटस रिपोर्ट मागितला होता,” असं न्यायालयाने सांगितलं. तसेच योगी सरकारने स्टेटस रिपोर्ट न्यायालयात दाखल केला आहे, अशी माहिती साळवे यांनी कोर्टात दिली. यूपी सरकारच्या वतीने न्यायालयात हरीश साळवे हजर झाले होते.
सुनावणीदरम्यान, सीजेआय म्हणाले की मुख्य आरोपीविरोधात अतिशय गंभीर गुन्हा दाखल असून ते न्यायालयात हजर झालेले नाही. यावर साळवे म्हणाले की, “आम्ही त्यांना पुन्हा नोटीस बजावली असून उद्या सकाळी ११ वाजता हजर राहण्यास सांगितले आहे. जर मिश्रा हजर राहिले नाही, तर कायदा त्याचं काम करेल. तसेच पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृतांना गोळी लागलेली नाही, त्यामुळे आरोपींना नोटीस बजावण्यात आली,” असे त्यांनी सांगितले. यावेळी “लखीमपूर हिंसाचार प्रकरणी यूपी सरकारच्या तपासावर आम्ही समाधानी नाही. राज्य सरकारने कठोर पावले उचलावी,” असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने तपास दुसऱ्या यंत्रणेकडे सोपवण्याचे संकेत दिले आणि विचारले की इतर कोणती यंत्रणा तपास करू शकते. या प्रकरणाची पुढील सुनावणी दसऱ्याच्या सुटीनंतर होण्याची शक्यता आहे.लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणावर आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.