अध्यक्षपदी सतीश पाटील तर उपाध्यक्षपदी लक्ष्मी मासेकर यांची निवड : राष्ट्रीय पक्षाचे मनसुबे धुळीला
प्रतिनिधी / येळ्ळूर
येळ्ळूर ग्रामपंचायतीवर म. ए. समितीची सत्ता येवू नये यासाठी प्रयत्न सुरू होते. आरक्षणापासूनच ही व्यूहरचना सुरू होती. मात्र म. ए. समितीच्या एकजुटीमुळे येळ्ळूर ग्रामपंचायतीवर महाराष्ट्र एकीकरण समितीचा भगवा फडकला असून राष्ट्रीय पक्षाचे मनसुबे धुळीला मिळाले आहेत. अध्यक्षपदी सतीश पाटील तर उपाध्यक्षपदी लक्ष्मी मासेकर यांची निवड झाली आहे. यामुळे सीमाभागातून समाधान क्यक्त होत आहे. अडीच वर्षांसाठी ही निवड असणार आहे.
येळ्ळूर ग्राम पंचायतीवर म. ए. समितीचे निर्विवाद वर्चस्व होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून काही सदस्यांत फूट पाडून आम्ही सत्ता स्थापणार, अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद राष्ट्रीय पक्षाकडेच असणार अशी वल्गना सुरू होती. मात्र अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद म. ए. समितीलाच मिळाल्याने जल्लोष करण्यात आला. येळ्ळूर विभाग म. ए. समितीचे अध्यक्ष शांताराम कुगजी, कार्याध्यक्ष दुद्दाप्पा बागेवाडी, प्रकाश अष्टेकर यांनी सर्व सदस्यांची एकजूट करून समितीकडे सत्ता ठेवण्यात यश मिळविले आहे.
अध्यक्षपदासाठी मोठी चुरस होती. मात्र काही जणांनी सामंजस्यपणा घेऊन सतीश पाटील यांना अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्यास सांगितले तर उपाध्यक्षपदासाठी लक्ष्मी मासेकर यांनी अर्ज दाखल केला. तर विरोधी गटातर्फे अरविंद पाटील यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला तर उपाध्यक्षपदासाठी राजकुंवर पावले यांनी अर्ज दाखल केला. अध्यक्षपदासाठी सतीश पाटील यांना 18 मते पडली तर विरोधी गटाच्या अरविंद पाटील यांना 12 मते पडली. तर उपाध्यक्षपदासाठी लक्ष्मी मासेकर यांना तब्बल 20 मते पडली तर विरोधी गटातील राजकुंवर पावले यांना 10 मते पडली. त्यामुळे म. ए. समितीचे दोन्ही उमेदवार
विजयी झाले.
येळ्ळूर ग्राम पंचायतमध्ये ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून सहाय्यक अभियंता हालण्णावर यांनी काम पाहिले. यावेळी ग्राम पंचायत पिडीओ अरुण नायक हे उपस्थित होते. निवडणूक पार पडल्यानंतर म. ए. समितीच्या सर्व सदस्यांनी एकच जल्लोष केला. याचबरोबर नेत्यांनीही समितीच्या सर्वांचेच स्वागत केले.
उपाध्यक्षा लक्ष्मी मासेकर यांना दोन मते अधिक
उपाध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत असलेल्या लक्ष्मी मासेकर यांनी दोन मते अधिक घेतली. त्यांना 20 मते पडली. त्यामुळे अध्यक्षपदापेक्षाही दोन मते अधिक घेतल्याने हा एक चर्चेचा विषय ठरला.