गाणे शिकणाऱया एका छोटय़ा शिष्याने एकदा आपल्या गुरुजींना धाडस करून विचारले की ‘गुरुजी, आपण आता आम्हाला शिकवता आहात तो राग कोणता?’ आणि त्यांनी उत्तर दिले होते. ‘बेटा, ये मन है!’ गाणे शिकायला जाणाऱया हौसे, गवसे आणि नवसे मंडळींना अगदी सुरुवातीच्या काळात नि रे ग म’ ध नि सां आणि सां नि ध प म’ ग रे सा असे आरोह अवरोह असलेल्या एका रागाची ओळख करून दिली जाते. या काळात आधी ते स्वर परत परत घोकणे काही फारसे आनंददायी वाटत नसते. त्यात हे नुसते सारेगम नसून एका रागाची ओळख असते. त्याबरोबरच निरेगरे निरेसा गम’ धप म’ गरेसा यासारखा एखादा स्वरसमूह ‘पकड’ म्हणून घोटायला दिलेला असतो. आपल्याला तोपर्यंत फक्त सांडशी किंवा स्क्रू पिळायची पकड तेवढी माहिती असते. ही नक्की कसली पकड? असला विचार करीत आपण दातओठ खाऊन तीही घोटत असतो. समोर आपले शिक्षक ती म्हणून दाखवतात तेव्हा अतिशय सुंदर, सुखद, सुरेल वाटते. मग घरी रियाज करत असताना किंवा त्यांच्या घरी आपण ती म्हणत असताना फुटक्मया काचेच्या तुकडय़ांसारखी चूर चूर का होते हेही आपल्याला कळत नसते. पण आपण रट्टा मारत राहतो. मग कधीतरी कीर्तन ऐकायचा योग येतो. पहिल्या जय जय राम कृष्ण हरी बरोबरच ते स्वर ओळखीचे वाटायला लागतात आणि एका गाफिल क्षणी ती पकड मनात पिंगा घालायला लागते. ओळख पटायला लागते. उत्सुकतेला पहिली पालवी फुटते. कीर्तनकार हौशी असतील तर ते मुद्दाम त्या रागाचे स्वर स्वतंत्र गाऊन दाखवतात. काही स्वरवाक्मय दाखवतात आणि मग मिश्किल हसून सांगतात, ये मन है! अर्थातच ती यमन रागाशी झालेली आपली ‘पहिली ओळख गोडीची’ असते. आतापर्यंत काही केल्या सजीव न वाटणारे ते स्वर फुलपाखरासारखे मनात उडू बागडू लागतात. मन भरून ते स्वर उधळले जातात. यमनचे बोट धरून रागांच्या महासागराच्या काठाकाठाने फिरस्ती करण्याची सुरुवात आताशी कुठे झालेली असते.
इकडे शिकणाऱयाची प्रगती आणि घोकंपट्टी जोरदार सुरूच असते. आता त्या पकडीशी जुळणारे स्वर कुठे मिळाले की लगेच ट्रायल एरर सुरू होते. हा यमन तर नाही? मग माणसाचा पा।़।़।़र गजा खोत होतो! शेजारच्या माहीतगाराला हळूच विचारून खात्री केली जाते आणि तो अंदाज बरोबर आला की मग गाडी सुसाट सुटते. तोपर्यंत ओळखीचे झालेले बाकीचे रागही फूटपट्टय़ा घेऊन मोहिमेवर निघतात आपापल्या हिशेबाने गाणी शोधायला. मग रेडिओ, टीव्ही, सीडी, पीडी (आता वायटी आणि नेटफ्लिक्स वगैरेही हं!) पैकी कशावरही गाणे ऐकायला मिळो आपण फूटपट्टी डॉट कॉम झालेलो असतो. कधी जुनी हिंदी गाणी कानावर लहरत येतात. कधी आँसू भरी है ये जीवन की राहें ऐकायला मिळते तर कधी भूली हुई यादों मुझे इतना ना सताओ अशी विनवणी आपल्याला हलवून जाते. शांतरस आणि भक्तिरस अशी वैशिष्टय़े असलेल्या यमनने एवढे कलेजवा कटार व्हायलाच हवे का? तर मन रे तू काहे न धीर धरें! जो निर्मोही मोह न जाने उनका मोह करें! बरोबर अपरंपार जळणाऱया विषादाची भावना वाहत राहते. तर चंदन सा बदन मध्ये अगदी चंदनी शृंगार दरवळत राहतो. खरंतर संयत स्वभाव असणाऱया व्यक्तीचे हे शांत एक्स्प्रेशन असते. भलेही शृंगारिक असेल पण यमन येतो मात्र चंदनाच्या लेपासारखाच. जा रे बदरा बैरी जा जा जा रे मध्ये अत्यंत चित्तवेधक लयीत त्रितालात नाचत तोच यमन येतो. विरहातली अधीरता यमनचे अवगुंठन घेऊन धन्य होत असावी. एकाच पदार्थापासून भजीही व्हावी आणि मिठाईही तसे निगाहे मिलाने को जी चाहता है ऐकल्यावर आपल्याला वाटते. लावण्यलतिकेचा सगळा रूबाब, अदा, नखरा, मिजास यमनचे अलंकार लेवून असा काही मिरवला आहे आणि नाचला आहे की नीरेकडून माडीपर्यंतचा प्रवास! आणि जब दीप जले आना सारखे गाणे तर फारच वेगळे रंग दाखवते. इथे दिसते ती यमनची प्रसन्न आदब! इथे तो खरेच मध्यमवर्गीय कौटुंबिक वाटतो… अशी कित्येक गाणी ऐकताना आपल्या मनातले यमनचे रूप हळूहळू आकार घेऊ लागलेले असते. अजूनही अवस्था आंधळे आणि हत्तीसारखीच असते पण चाचपडण्यात आनंद असतो. कारण आंधळय़ा माणसाला आपल्याला हत्ती अनुभवायला मिळणार याचा आनंद त्याला तो पहायला मिळणार नसतो या भावनेला वरचढ ठरतो. एव्हाना गाडी थोडी पुढे सरकलेली असते. यमन रागावर आधारित असलेली गाणी किंवा कधी कधी कानावर पडणारे यमनचे सूर स्पष्ट ओळखता येऊ लागलेले असतात. आता नुसत्या आरोहावरोहा पलीकडे किंवा पकडीनंतरही खूप काही असते हे अगदी किंचितसे जाणवून जात असते. फक्त ते कुणाला सांगावे की नाही हा प्रश्न असतो आणि आपल्याला यमनची गंमत कळायला लागली हे सांगण्यापेक्षा त्यातली अजून गंमत ऐकण्याकडे कल वाढत असतो. एरी आली पिया बिन किंवा संगत कीन्हे गुनियन की वगैरे बंदिशीच्या अगोदर करायला लागणाऱया स्वरविस्ताराची मोठी भर पाठांतरात पडलेली असते. पण आता पहिल्यासारखा कंटाळा येणे कमी झालेले असते. उलट त्यातली मजा कळायला लागलेली असते. आता ऐकता ऐकता कळायला लागते की यमन हा गानसृष्टीत सर्वोच्च वापरल्या जाणाऱया रागांपैकी एक आहे. जुन्या नव्या हिंदी चित्रपटगीतातच नव्हे तर मराठी गानसृष्टीतही त्याचा वावर प्रचंड आहे आणि अगदी दाक्षिणात्य ते पौर्वात्य चित्रपटसृष्टीही त्याने वगळली नाही हेही कळते. गझलची दुनियाही त्याने रंगवून सोडली आहे. ‘गझल’ एवढे उच्चारल्यावर पहिल्यांदा आठवते ती म्हणजे रंजिश ही सही, दिल दुखाने के लिये आ. मेहंदी हसनसाहेब जेव्हा म्हणतात की इस गजल की जमीन यमन की है! तेव्हा जे काय गदगदून यायला होते ना, ते रसिकच जाणोत. खरंच, यमन भूमी झालेला असतो आणि अनेक गझलांची रोपटी त्यावर सरसरून वाढत महावृक्ष होऊन जातात. एखाद्या निवांत क्षणी जेव्हा पं. भीमसेन जोशी यांच्या पहाडी आवाजात अधिक देखणे तरी निरंजन पाहणे अभंग कानावर पडतो. कमालीच्या हळुवारपणे आवाज लावला आहे यात पंडितजींनी! स्वरविस्तार हा भाग ज्या नवशिक्मया माणसाने अभ्यासला असेल त्याला या गाण्यात त्या संकल्पनेचे ठसठशीत अस्तित्व जाणवेलच. एकेका कडव्याप्रमाणे मंद्र मध्य आणि शेवटी माफक प्रमाणात तारसप्तकाचे स्वर वापरून हे गाणे असे काही जमवले आहे की गीतकार ज्ञानेश्वर माउली, संगीतकार आणि गायक भीमसेनजी या त्रैमूर्तीला साष्टांग नमस्कार घालावा लागतो. यमनची तंत्रापलीकडची खोली जाणवायला लागणे या गाण्यातून घडतेच. राम रंगि रंगले हे असेच ‘यमनची रेशमी करामत’ असलेले गाणे! आणि या गाण्यांमध्ये भीमसेनजींनी स्वतःच्या अफाट कलाकारीचे रंग असे काही भरले आहेत की यमन मनात घरच बांधून रहायला लागतो. स्वरतीर्थ सुधीर फडके यांचे पराधीन आहे जगती हे यमनमधून करुण सौंदर्याचे श्रे÷तम दर्शन घडवणारे गाणे. एक वार पंखावरुनि हेही तसेच. या आणि अशा महान हस्तींनी यमन कोळून प्यायला होता की काय असा प्रश्न पडावा अशी असंख्य गाणी आहेत. अगदी लावण्याही यमनचा साज लेवून आहेत. त्याचे सर्वस्पर्शित्त्व जाणवणे वाढत जाते ते जसे ऐकत जावे तसे. (क्रमशः)
अपर्णा परांजपे-प्रभु