ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
जम्मू-काश्मीरच्या हंडवारा परिसरात भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत शहीद झालेले कर्नल आशुतोष शर्मा यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये आणि कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देणार असल्याची घोषणा योगी सरकारने केली आहे.
योगी आदित्यनाथ यांनी पाच जवान शहीद झाले याबद्दल दुःख व्यक्त करताना म्हटले की, त्यांचा पराक्रम कधीच विसरला जाणार नाही. त्यांच्या या शौर्याला प्रणाम. आमच्या सद्भावना सदैव त्यांच्या परिवारासोबत आहेत.
या संदर्भातील माहिती देताना अपर मुख्य सचिव गृह अविनाश कुमार अवस्थी म्हणाले की, शहीद कर्नल आशुतोष शर्मा उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील खानापूर गावात राहत होते. त्यांच्या मृत्यूने मोठे नुकसान झाले आहे. सरकारकडून त्यांच्या कुटुंबीयांना पन्नास लाख रुपये आणि परिवारात एका सदस्यास सरकारी नोकरी दिली जाईल. तसेच बुलांदशहर जिल्ह्यात दारात त्यांच्या नावाचे प्रवेशद्वार बनवून त्यांना गौरव करण्यात येणार आहे.
कर्नल शर्मा हे 21 राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर होते. त्यांना काश्मीरमध्ये दोन वेळा वीरता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. हंडवारा परिसरात झालेल्या हल्ल्यात कर्नल आशुतोष शर्मा यांच्यासह अजून पाच जवान शहीद झाले आहेत.