विधानपरिषद विरोधी पक्षनेते एस. आर. पाटील यांनी व्यक्त केली भावना
प्रतिनिधी /बेळगाव
कृष्णा अप्पर योजनेचा तिसरा टप्पा अपूर्ण आहे. तो टप्पा पूर्ण केल्यास 30 लाख 32 हजार 313 एकर जमीन ओलीताखाली येणार आहे. यासाठी 2 लाख 73 हजार 700 एकर जमीन घ्यावी लागणार आहे. 60 हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. जर ही योजना भाजप सरकारने पूर्ण केली तर जनता त्यांना आशीर्वाद देईल. राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार, डबल इंजीन आहे. तेव्हा त्याचा उपयोग करून ही योजना पूर्णत्वास न्यावी. यामुळे 7 जिल्हय़ांचे सुजलाम, सुफलाम होईल. हा प्रकल्प पूर्ण झाला तर जनता तुम्हाला निश्चितच आशीर्वाद देईल, अशी भावनिक साद विधानपरिषद विरोधी पक्षनेते एस. आर. पाटील यांनी सभागृहात घातली.
या जलाशयाचा तिसरा टप्पा पूर्ण झाला तर 330 टीएमसी पाणीसाठा करायला मिळणार आहे. त्यामुळे 7 जिल्हय़ांना हे पाणी पुरणार आहे. कर्नाटक राज्य हे एक स्थिर राज्य आहे. या राज्याचा अर्थसंकल्पही मोठा आहे. त्यामुळे या रकमेची तरतूद करणे काहीच अडचणीचे नाही. यावेळी त्यांनी उदाहरण देताना तेलंगणा राज्य नुकतेच निर्माण झाले आहे. मात्र त्यांनी जगातील सर्वात मोठे जलाशय उभारण्याचा निर्धार केला आणि केवळ तीन वर्षांत जलाशय उभे केले आहे, असे सांगितले.
तेलंगणात 1 लाख 20 हजार कोटी रुपये खर्च करून जलाशय उभे केले आहे. त्यामुळे 13 जिल्हय़ांची जमीन ओलीताखाली आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तेव्हा त्यांचा आदर्श डोळय़ासमोर ठेवून राज्य सरकारने कृष्णा अप्पर जलाशय योजनाही पूर्ण करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. जर ही योजना पूर्ण झाली नाही तर जनता मात्र तुम्हाला माफ करणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.