देवरूखच्या बंधू कोळवणकर यांची रक्तदानाची ‘सेंच्युरी’
राजेंद्र शिंदे/ चिपळूण
1983 साली आईच्या गंभीर आजारावेळी रक्तासाठी करावी लागलेली यातायात लक्षात घेऊन संगमेश्वर तालुक्यातील देवरूख येथील उदय उर्फ बंधू कोळवणकर यांनी रक्तदानाचा वसा हाती घेतला. वयाच्या 18व्या वर्षी पेटवलेला रक्तदानाचा हा यज्ञकुंड आज 54व्या वर्षीही अविरतपणे धगधगत आहे. या अवलियाने कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह बेळगावपर्यंत रक्तदान केले आहे. रक्ताच्या नात्यातून फुललेल्या समर्पण भावनेची ‘शंभरी’ कोळवणकर यांनी गेल्याच महिन्यात गाठली आहे. रविवारी रक्तदान दिनानिमित्त या रक्तदात्याच्या कर्तृत्वाला ‘तरूण भारत’चा सलाम!
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानून अनेक व्यक्ती दुसऱयाचे प्राण वाचवण्यासाठी धडपडत असतात. त्यातीलच देवरुख-दत्तनगर येथील 54 वर्षिय बंधू कोळवणकर हे एक होत. समर्पित भावनेने लोकांचे प्राण वाचवण्यासाठी रत्नागिरी जिल्हय़ासह मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, बेळगांवपर्यत जाऊन रक्तदान करणाऱया कोळवणकर यांनी रक्तदानाची ‘सेंच्युरी’ मे महिन्यात चिपळुणात पूर्ण केली.
रक्तदान दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी 36 वर्षाचा आपला प्रवास उलगडला. त्यांच्या आईला पाईल्सचा त्रास होता. एकेदिवशी त्यांनी आईला देवरूखमधील डॉ. बोरडवेकर यांच्याकडे दाखल केले. मात्र रक्तस्त्राव वाढल्याने डॉक्टरांनी रक्ताची गरज लागेल असे सांगितले. जवळपास रक्त उपलब्ध नसल्याने त्यांनी थेट जिल्हा रूग्णालय गाठले. तेथे सर्व चाचण्या केल्या. त्यांचा रक्तगटही आईच्या रक्तगटाशी जुळल्याने एक बॅग रक्त दिले. ही रक्ताची बॅग बर्फामध्ये टाकून देवरूखला आणली आणि आईला उपचारासाठी दिली. यामध्ये आईला झालेला त्रास, उपलब्ध न झालेले रक्त या सर्वांचा विचार करताना कोळवणकर यांच्यात एक समर्पणाची भावना निर्माण झाली. इतरांनाही अशाचप्रकारे रक्ताची गरज केव्हाही, कधीही भासू शकते हे ओळखून तेव्हापासूनच रक्तदान करण्याचा निर्णय घेतला आणि तो आजपर्यंत अंमलात आणला आहे.
साधारणपणे तीन महिन्यांनी एकदा रक्तदान करता येते. कोळवणकर त्यानुसार वर्षातून चारवेळा न चुकता रक्तदान करत असले तरी एरव्ही कधीही, कुणीही रक्तासाठी अडचणीच्या काळात हाक मारली तरीही ते सज्ज असतात. रक्तदान शिबिरात शक्यतो कोळवणकर रक्तदान करत नाहीत. कुणी बोलावलं तर मात्र जातात. कारण शिबिरात अनेकजण रक्तदान करतात. मात्र रूग्णाला ज्यावेळी खरोखरच नितांत गरज असते त्यावेळी मात्र कुणीही धावून जात नाही. त्यामुळे कोळवणकर आपले रक्त अशा रूग्णांसाठी राखीव ठेवतात. यामुळे आजच्याघडीला जिल्हय़ातच नव्हे तर जिल्हय़ाबाहेरील ब्लड बँकेत त्यांचे नाव आदराने घेतले जाते.
कुटुंबियांचाही पाठिंबा
देवरूख येथील शिवनेरी पतसंस्थेत रिकव्हरी ऑफिसर असलेले बंधू कोळवणकर हे दत्तनगर येथे पत्नी आणि मुलासह राहतात. या समाजकार्यात त्यांना त्यांच्या कुटुंबियांचाही पाठिंबा मिळत आहे. शंभरवेळा रक्तदान केले असले तरी त्यांनी कुठेही गाजावाजा केला गेलेला नाही. रक्तासाठी कुणी हाक मारली तर समर्पित भावनेतून धावून जाणे हेच त्यांच्यादृष्टीने महत्वाचे आहे.
नेत्रदान, देहदानासाठी 27 वर्षांपूर्वीच नोंदणी
रक्तदानाची शंभरी गाठलेल्या कोळवणकर यांनी नेत्रदान, देहदानासाठीही 27 वर्षापूर्वीच नोंदणी केली आहे. नेत्रदान, देहदानासाठी सध्या जनजागृती होत असली तरी कोळवणकर यांनी 1992साली लायन्स क्लब रत्नागिरीच्या माध्यमातून मरणोत्तर नेत्रदान तसेच त्याच वर्षी डेरवण हॉस्पिटलच्या माध्यमातून देहदानाचा अर्ज केला आहे.
रक्तदान सर्वश्रेष्ठ दान
रक्तदान केल्याने कोणताही आजार जडत नाही. थकवाही जाणवत नाही. उलट अधिक उर्जा मिळते. त्यामुळे तरूणांनो रक्तदान करा, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. या दानातून दुसऱयाचे प्राण वाचवण्याचे मोठे पुण्य आपल्याला मिळते, असे कोळवणकर हे आजच्या पिढीला सांगतात.