विमानतळासाठी 27.99 हेक्टरपैकी 19.92 हेक्टर भूसंपादन पूर्ण
प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे येथील प्रस्तावित भूसंपादनासाठी आवश्यक 100 टक्के निधी शासनाकडून प्राप्त झाला आहे. आता 31 जानेवारीपर्यंत संपूर्ण भूसंपादन करुन विमानतळासाठी आवश्यक जमिनीचा ताबा प्रशासनाकडे घेण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱयात यापैकी 4 जणांना प्राथमिक स्वरुपात निधीचे वाटप करण्यात आले आहे.
रत्नागिरी शहरातील विमानतळ हा बरेच वर्ष रत्नागिरीकरांसाठी जिव्हाळ्य़ाचा प्रश्न झाला आहे. इथल्या विमानतळावरील सुरक्षेचा प्रश्न, धावपट्टी, नाईट लँडिंग, योग्य पार्किंग अशा बऱयाच प्राथमिक प्रश्नांमुळे रत्नागिरीमधील विमानतळ असूनही नसल्यातच जमा होते. हे विमानतळ लवकरात-लवकर सर्व सोयीसुविधांनी सज्ज व्हावे, यासाठी प्रशासनाकडे तगादा सुरु होता. अत्याधुनिक विमानतळासाठी असलेल्या जागेपेक्षा जास्त जागेचे भूसंपादन करणे गरजेचे होते. यासाठी मिरजोळेसोबतच तुवंडेवाडी येथील जागा अधिग्रहित करण्यात आली आहे.
प्रशासनाकडून विमानतळासाठी आत 27.99 हेक्टर एवढी जागा संपादित करण्यात येत आहे. यामध्ये तुवंडेवाडी येथील 19.92 हेक्टर आणि मिरजोळे येथिल 8.6 हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन प्रस्तावित आहे. यापैकी तुवंडेवाडी येथील जागेचे निवाडे प्रांताधिकाऱयांकडून करण्यात आले आहेत. तर मिरजोळेतील संबंधित जमीन मालकांना नोटीसा काढण्यात आल्या आहेत. या भूसंपादनासाठी आवश्यक 77.70 कोटीचा निधी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाला आहे आणि संबंधित जमीन मालकांना निधी वितरित करण्याचे काम सुरु असल्याचे सांगण्यात आले. यापैकी 4 जमीन मालकांना नुकताच मुख्यमंत्र्यांच्याहस्ते निधी वितरित करण्यात आला आहे. आता लवकरच उर्वरित जमिनींसंदर्भातील निवाडे घेवून 100 टक्के निधी वितरित करण्यात येणार आहे.
जमिनींचे भूसंपादन 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करणार
विमानतळासाठी आवश्यक संपूर्ण जमिनींचे भूसंपादन येत्या 31 जानेवारी 2023 पर्यंत पूर्ण करुन लवकरच या जमिनींचा ताबा घेण्यात येईल. ताबा मिळाल्यानंतर लगेचच भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्याकडून काम सुरु करण्यात येईल.
–विकास सूर्यवंशी
प्रांताधिकारी, रत्नागिरी