जिल्हय़ात मृत्यू दर कमी करण्याचे आव्हान
जान्हवी पाटील/ रत्नागिरी
जिल्हय़ात कोरोना रुग्णसंख्येवर पुरेसे नियंत्रण आले नाही. त्यातच चिंतेची बाब म्हणजे मृत्यूचीही संख्या वाढतीच आहे. जिह्यातील मृत्यूदर 3.3 पर्यंत पोचला असून तो आटोक्यात आणण्यासाठी व त्यामागील कारणे शोधण्यासाठी जिल्हय़ातील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचे ‘डेथ ऑडिट’ केले जात आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी दिली.
अनेक आजार असलेल्या रुग्णांना हा नवा व्हायरस लवकर गंभीर अवस्थेत नेत असल्याचे या डेथ ऑडिटमुळे निदर्शनास आले आहे. यामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह असलेल्या रुग्णांचा अधिक समावेश आहे. महिनाभरात 27 ते 45 वयोगटातील तरुण रुग्णांचाही मृत्यू झाला. वेळेत उपचारासाठी न येणे, घरच्या घरी औषधे घेऊन आजार अंगावर काढणे व आजार गंभीर झाल्यावर उपचारासाठी येण्यामुळे हे मृत्यू वाढल्याचे डॉ. फुले यांनी स्पष्ट केले. रुग्ण रुग्णालयात येईपर्यंत फुफ्फुसापर्यंत संसर्ग पोचलेला असतो. त्यांची परिस्थिती खूप गंभीर झालेली असते. ही बाबही ऑडिटमुळे समोर आली आहे. ताप, सर्दी, खोकला याकडे नेहमीचा आजार म्हणून दुर्लक्ष केले जात असल्याने मृत्यूदर वाढल्याचे डॉ. फुले यांनी सांगितले.
‘माझी रत्नागिरी माझी जबाबदारी’ मोहिमेत आतापर्यंत 11 लाखांहून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 990 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. या मोहिमेमुळे लक्षणे आढळल्यास त्वरित औषधोपचार शक्य झाले आहेत. रत्नागिरीत स्वतंत्र ऑक्सिजन प्लॅन्ट असल्याने सध्या ऑक्सिजनची कमतरता नाही, व्हेंटिलेटरची संख्या वाढवण्यात येणार आहे. बेडची संख्याही दुपटीने वाढवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व प्रयत्नांमुळे डेथ रेट कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 1 ते 12 मे 2021 या बारा दिवसाच्या कालावधीत आतापर्यंत सर्वाधिक तब्बल 195 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. या डेथ ऑडिटचा पुढील वाटचालीत निश्चित फायदा होणार असल्याचेही शेवटी डॉ. फुले यांनी सांगितले.