प्रतिनिधी/ बेळगाव
मुस्लीम बांधवांच्या सर्वात पवित्र मानल्या जाणाऱया रमजान पर्वाची समाप्ती रमजान ईद सण साजरा करून केली जाते. रविवारी चंद्रदर्शनानंतर सोमवारी मुस्लीम धर्मियांकडून रमजान ईदचे आचरण केले जाणार आहे. मात्र संपूर्ण देशावर कोरोनाची संकटछाया असताना रमजानचा उत्साह या संकटात विरून गेला आहे. खाद्यपदार्थांची रेलचेल आणि खरेदीचा उत्साह, परस्परांची भेट, शिरखुर्मा-बिर्याणीची दावत, सामूहिक नमाज पठण करून मोठय़ा उत्साहात परस्परांना ईद मुबारक अशा शुभेच्छा देऊन या सणाचा आनंद घेतला जातो. मात्र, कोरोनाच्या सावटात या सणाचा उत्साह लॉकडाऊन झाला आहे. यामुळे मुस्लीम बांधवांकडून रमजान ईद साध्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे.
कोरोनामुळे ईदगाह मैदानावर होणारे सामूहिक नमाज पठण रद्द केले असून घरातच नमाज पठण करून शांततेचा संदेश देणारा ईदचा सण साजरा केला जाणार आहे. संपूर्ण मानवजातीला या संकटाचा फटका बसला असून कोरोना महामारीचे संकट लवकर दूर व्हावे, अशी प्रार्थना केली जाणार आहे. रविवारी संपूर्ण बाजारपेठ बंद असल्याने रितीरिवाजाप्रमाणे आवश्यक साहित्याची खरेदी शनिवारीच करण्यात आली होती. सोमवारी रमजान पर्वाची शेवटची नमाज अदा करत या पर्वाची समाप्ती होणार आहे. संपूर्ण महिनाभर लॉकडाऊनच्या काळात मुस्लीम बांधवांनी रोजाचे आचरण केले असून शेवटचा दिवस नियमांचे पालन करत घरात राहून साजरा केला जाणार असल्याच्या प्रतिक्रिया मुस्लीम बांधवांकडून व्यक्त होत आहेत.
कोरोना संकट लवकर दूर व्हावे,: शबाना पटवेकर
रमजान पर्व चार आठवडय़ांचे असते. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे रमजान पर्वावर संकटाची छाया आहे. रमजानचा अशोहरा अर्थात शेवटचा आठवडा खरेदीचा मानला जातो. सर्वच वस्तू नवीन खरेदी करून हा सण साजरा होतो. मात्र, देश संकटात असताना खरेदीचा आनंद न लुटता रिवाजाप्रमाणे सण साध्या पद्धतीने आणि कुटुंबातच साजरा करणार आहे. परस्परांची गळाभेट, सामूहिक नमाज पठण, कुटुंबातील मोठय़ांकडून लहानांना ईदची भेट, परस्परांच्या घरी जाऊन शिरखुर्मा खाणे हा आनंद यंदा घेता येणार नाही. मात्र प्रत्येकाचे कुटुंब सोबत असून हे संकट लवकर दूर व्हावे, अशी प्रार्थना करूनच ईद साजरा करणार असल्याचे मत शबाना पटवेकर यांनी व्यक्त केले.
मदत देऊन दानाची प्रथा पार पाडणार : आस्मा नाईक
दरवर्षी रमजाननिमित्त परस्परांची भेट घेऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. मात्र कोरोनाच्या संकटात केवळ आपल्या कुटुंबीयांसोबत रमजान साजरा केला जाणार आहे. यामुळे शांततेत प्रार्थना करण्याबरोबरच कुराणाचे पठण करण्याची संधी मुस्लीम बांधवांना मिळणार आहे. रमजानच्या निमित्ताने दान दिले जाते. या संकटात गरजू व गरिबांना धान्याचे किट व आर्थिक स्वरुपात मदत देऊन दानाची प्रथा पार पाडणार आहे. नवी पहाट येऊन ही परिस्थिती निवळेल याची जाणीव राखत यंदा साध्या पद्धतीनेच रमजान साजरा करणार असल्याचे मत आस्मा नाईक यांनी व्यक्त केले.
सामाजिक अंतर पाळूनच हे संकट दूर होणार : अस्लम मिर्झा
कोरोनाच्या संकटात संपूर्ण जनता भरडली जात असून सामाजिक अंतर पाळूनच हे संकट दूर होणार याची जाणीव प्रत्येकाला आहे. यामुळे बाजारात ग्राहकांचा कल कमी होता. दरवर्षी होणारी खरेदी केवळ 20 टक्के इतकीच झाली. मात्र, हे संकट लवकर दूर होऊन पुन्हा नवी पहाट यावी, अशी आशा व्यक्त करत ईदच्या निमित्ताने प्रार्थना केली जाणार आहे. जान है तो जहान है याचे भान राखत मुस्लीम बांधवांकडून साध्या पद्धतीने रमजानचे आचरण होणार असल्याचे मत अस्लम मिर्झा यांनी व्यक्त केले.
हजारोंची उलाढाल ठप्प झाली : इम्तियाज
कोविड-19 मुळे आर्थिक संकट समोर उभे राहिले आहे. हजारोंची उलाढाल यामुळे ठप्प झाली असून रमजानचा आनंद या संकटात विरला आहे. दरवर्षी हा सण मोठय़ा दिमाखात आणि झगमगाटात साजरा होतो. मात्र, यंदा बाजारपेठेत तितकासा उत्साहच दिसून आला नाही. रविवारी 100 टक्के बंदला प्रतिसाद देत मुस्लीम बांधवांनी शनिवारीच खरेदी केली. सोमवारी घरातच रमजानची नमाज अदा करत शिरखुर्म्याचा लाभ घेऊन रमजान पर्वाची समाप्ती करण्यात येणार असल्याचे मत इम्तियाज यांनी व्यक्त केले.
केवळ रिवाजाप्रमाणे रमजानचे आचरण : आझाद मुल्ला
कोरोनाच्या संकटात यंदाचे रमजान पर्व सुनेसुने गेले आहे. ना खरेदीचा उत्साह होता ना खाद्यपदार्थांची रेलचेल होती. या संकटात लाखोची उलाढाल ठप्प झाली असून मुस्लीम बांधवांकडून केवळ रिवाजाप्रमाणे रमजानचे आचरण केले जाणार आहे. या निमित्ताने करण्यात येणाऱया नमाज पठणात शांती आणि सुरक्षिततेची प्रार्थना करून संकट लवकर दूर व्हावे अशी दुवा मागणार आहे. शिवाय प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचे पालन करत घरातच नमाज पठण केले जाईल, असे मत आझाद मुल्ला यांनी व्यक्त केले.