ऑनलाईन टीम / मुंबई :
शिवसेनेसोबत राजकारणाचा प्रयत्न झाला तो मोडीत काढण्यासाठी मी मुख्यमंत्री झालो. अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्ला चढवला. माझे स्वप्न नाही पंतप्रधान बनण्याचे, परंतु भविष्यात शिवसैनिकला पंतप्रधानही बनवणार, असा निर्धारही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केला.
पुढे ते म्हणाले, कधीही अन्याय सहन करू नका. अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला आहे. शिवसैनिक कधीही संकटाला घाबरणार नाही डगमगणार नाही. घट्ट पाय रोवून उभा राहतो तो शिवसैनिक आणि हा मर्द शिवसैनिक माझ्यासोबत आहे शिवसेनेने आपली विचारधारा बदललेली नाही, असं ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पुढे ते म्हणाले, आज कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे मास्क तोंडावर आला असला तरी आपला आवाज कुणी दाबू शकत नाही. शिवसेनाच एक वादळ आहे. अशी कितीही वादळे आली तरी हे भगवे वादळ कायम राहणार आहे. शिवसेना हेच एक वादळ आहे, आम्हाला वादळाची परवा नाही.
ज्यावेळी कोरोनाचं संकट आलं तेव्हा कस्तुरबा आणि पुणे येथे फक्त दोनच लॅब होत्या, त्या आता आपण 100 लॅब केल्या आहेत. आपण लॅब आणखी वाढवणार आहोत. शिवसैनिकांनी देखील ह्या संकटाला रोखण्यासाठी प्रयत्न करावेत. यावेळी स्वतःची काळजी घेऊन दुसऱ्याला मदत करावी, असे आवाहन त्यांनी सर्व शिवसैनिकांना केले.