प्रतिनिधी/ गुहागर
मी टाकलेली फेसबुक पोस्ट वाचली असती तर त्यामधील विषय, आशय लक्षात आला असता. मात्र फेसबुक पोस्ट कुणीतरी वाचली, कुणीतरी कानात येऊन सांगितली आणि वैयक्तिक आरोपांचे विषय सुरू झाले. मात्र राजकारण बाजुला ठेऊन सर्वांनी कोकणातील जनतेच्या अडचणी सोडवुया, असा मार्मिक संदेश भाजपाचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
माजी मंत्री रामदास कदम हे मुंबईवरून कशेडी येथे आले व त्यांनी तेथील चेक पोस्टवरील अधिकाऱयांना काही सूचना केल्या होत्या. यावर डॉ. नातू यांनी त्यांच्यावर टीका केली होती. यानंतर खेड युवासेनेने नातूंविरोधात निदर्शने केली होती.
या पार्श्वभूमीवर नातू यांनी काढलेल्या या प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, रामदास कदम 2019ची विधानसभा निवडणूक झाल्यानंतर व महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर प्रथमच बोलले. यामुळे आपल्याला थोडे बरे वाटले. मी उत्तर रत्नागिरी जिल्हा भाजपाचा अध्यक्ष असल्याने व महाराष्ट्रामध्ये भाजपा प्रमुख विरोधी पक्ष असल्याने महाविकास आघाडी सरकारच्या चुका मांडणे, दाखवून देणे हे भाजपाचे कामच आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काही चुका मांडल्यामुळेच जिल्ह्यातील जनतेसाठी काही सुविधा प्राप्त झाल्या, शासकीय कर्मचाऱयांवर झालेले अन्यायही दूर झाले. महाविकास आघाडीच्या सरकारचे वारंवार, दररोज बदलत असणाऱया निर्णयांमुळे कोकणातील जनतेला जो अतोनात त्रास सहन करावा लागत आहे हेच मी मांडले होते. महाविकास आघाडीचे काही मंत्री अनेक जिल्ह्यांमध्ये वारंवार बैठका घेत होते. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर सर्व मंत्रीमहोदयांच्या आढावा बैठका बंद झाल्या. रत्नागिरीच्या पालकमंत्र्यांनी व रत्नागिरीतील मंत्रीमहोदयांनी कोरोनासंदर्भात योग्यपद्धतीने आढावा बैठका न घेतल्यामुळे अनेक गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, 17 हजार लोकसंख्या असलेल्या गावांचे सरपंच व प्रशासनाचे खाते प्रमुख अशा आढावा बैठका घेवून सर्वांना योग्य मार्गदर्शन केले असते तर कोरोना आजाराचं गांभीर्य समजून घेण्यात व दाहकता कमी करण्यात जिल्हा प्रशासन यशस्वी झाले असते, पण इथेही महाविकास आघाडीच्या मंत्र्यांचे राजकारण होते व त्यांनीसुद्धा काही मतदार संघातच व काही तालुक्यात बैठका घेतल्या.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे बंद झालेल्या आढावा बैठका रामदासभाईंच्या आढावा बैठकीमुळे पुन्हा जिल्ह्यामध्ये सुरू झाल्या व थांबलेल्या आढावा बैठकांचे पुन्हा महाविकास आघाडीच्या आमदारांचे राजकारण सुरू झाले आहे. हे राजकारणाचे दिवस नाहीत. कोण घरात बसलंय, कोण बाहेर फिरतोय, कोण होम क्वारंटाईन आहे याचे जनतेला परिपूर्ण ज्ञान आहे. आज राजकारण करण्याची वेळ नाही. अजूनही मुंबई, पुणे येथून कोकणातील भूमिपूत्र गाडीचे भाडे परवडत नसल्याने, पास मिळत नसल्याने, शहरातील नोकरीधंदा बंद झाल्याने पायी चालत येत आहेत. कोरोनाच्या नंतर उद्भवणाऱया अनेक समस्यांवर एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. त्यानंतर राजकारण करण्यास सर्वांनाच वेळ आहे. तुर्तास राजकारण हा विषय बाजूला ठेऊन कोकणातील जनतेच्या अडीअडचणी सोडवून त्यांचा त्रास दूर करणे एवढय़ाच विषयाला माझे प्राधान्य आहे, असे नातू यांनी या पत्रकात म्हटले आहे.