राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेना विरूध्द भाजपचा रोजचा सामना गेल्या जवळपास अडीच वर्षे लोकांचे मनोरंजन करत आहे, मात्र आता भाजप नेते किरीट सोमय्या यांना पुण्यात शिवसैनिकांनी केलेली धक्काबुकी आणि संजय राऊत यांच्या कुटुंबियांवर केलेली इडीची कारवाई यामुळे आता राऊत हे कमालीचे आक्रमक झाले असून आज राऊत हे शिवसेना भवनात पत्रकार परीषद घेऊन भाजप नेत्यांची आणि केंद्रीय तपास यंत्रणांची पोलखोल करणार आहेत. त्यामुळे आजच्या पत्रकार परीषदेत संजय राऊत काय गौप्यस्फोट करणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आल्यानंतर विरोधीपक्षात असलेल्या भाजप आणि सत्तेत असलेल्या शिवसेना यांच्यात रोज कलगीतुरा बघायला मिळत आहे, राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा घेतलेल्या निर्णयानंतर सोमय्या यांनी वाईन व्यवसायात राऊत यांच्या कुटुंबियांची असलेली भागिदारी आणि यासाठीच सरकारने वाईन विक्री खुल्या बाजारात करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप केला. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारचे सर्वेसर्वा असलेले शरद पवार यांनी देखील लोकांचा या निर्णयाला होत असलेला विरोध हा चिंतेचा विषय असून या निर्णयाबाबत फेरविचार करण्याचे सुतोवाच केले. राऊत यांच्यावर सोमय्या यांनी केलेल्या आरोपानंतर आक्रमक झालेल्या राऊत यांनी मग थेट अमित शहा यांचा मुलगा ढोकळा विकतो का, किरीट सोमय्यांचा मुलगा शेंगदाणे विकतो का ? असा थेट सवाल विचारला, तर राऊत यांचे निकटवर्तीय यांना पुण्यात कोव्हिड सेंटरचे दिलेले काम आणि त्या कामात झालेला गैरव्यवहार याबाबत तक्रार करण्यासाठी सोमय्या हे पुण्यात गेले असता शिवसैनिकांनी केलेली धक्काबुकी, त्यामुळे आता शिवसेना भाजप जे मुद्यावर रोज एकमेकांशी भांडत होते ते आता गुद्यावर येऊ लागलेत. गेल्या काही दिवसातील काही नेत्यांच्या प्रतिक्रिया बघीतल्या तर एकेरी उल्लेख करत थेट धमक्यांची भाषा करत आहेत. घरात घुसण्याची भाषा केली जात आहे ती या नेत्यांना शोभणारी नाही. राऊत यांनी मुंबईत शिवसेनाच दादा असल्याची भाषा करताना नागपूरात आम्ही घुसलो तर बाहेर पडणे मुश्कील होईल असे आव्हानच थेट फडणवीस यांना दिले तर काल भाजप नेते प्रसाद लाड यांनी नाना पटोले यांचा एकेरी शब्दात उल्लेख करताना नाना तुम्ही फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर येऊनच दाखवा असे आव्हान दिले. राजकारणात अनेक वर्षे विधीमंडळात, संसदेत प्रतिनिधीत्व केलेल्या शिर्ष नेत्यांनी अशी भाषा वापरणे हे महाराष्ट्राच्या राजकारणाला नक्कीच भुषणावह नाही. त्यामुळे आरोप प्रत्यारोप होत राहतील आणि करावे मात्र सध्या ज्या पध्दतीची भाषा राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडून केली जात आहे, त्यावर नक्कीच आत्मचिंतन सर्वच पक्षांनी करण्याची गरज आहे. नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केल्यानंतर किंवा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे विधानभवन परीसरात येत असताना विरोधीपक्षाच्या आमदारांनी म्याव म्याव असा आवाज काढल्यानंतर विधानभवनात लगेच दुसऱया दिवशी या विषयावर खल झाला. संसदीय सभ्याचार आणि शिष्टाचार तसेच लोकप्रतिनिधींसाठीची आचारसंहीता या विषयावर बरीच चर्चा झाली. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तर जे आमदार नियम पाळत नसतील त्यांना शिक्षा करा असे सांगताना मोठे भाषण केले, जे नाना पटोले विधानसभेत या विषयावर आक्रमकतेने बोलत होते तेच बाहेर कोणती भाषा करतात, हे गेल्या काही दिवसात त्यांनी केलेली वादग्रस्त वक्तव्ये पाहता समजते. त्यामुळे केवळ लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने वागले पाहीजे असे बोलत असताना बाहेर मात्र हेच नेते जी भाषा वापरतात त्यावरही आत्मचिंतन होण्याची गरज आहे.
मुंबई, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई महापालिका निवडणूकीच्या तोंडावर एकमेकांची उणी दुणी काढण्याची जणू आता स्पर्धाच लागली आहे की काय असे सध्या तरी दिसत आहे. भाजपने महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर युती तोडल्याचा वचपा काढायचा ठरवून शिवसेनेवर जोरदार हल्ला करण्यास सुरूवात केली आहे. 2017 साली कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूका शिवसेना भाजप स्वतंत्र लढत असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाघाच्या जबडय़ात घालुनी हात मोजीतो दात ही जात आमची असे बोलत शिवसेना आणि उध्दव ठाकरेंवर जोरदार हल्ला केला होता. त्यानंतर शिवसेना नेते रामदास कदम यांनी फडणवीस बच्चा असल्याचे म्हटले होते. सेना भाजपमधील वरीष्ठ नेत्यांचा हा कलगीतुरा चांगलाच गाजला होता. विशेष म्हणजे त्यावेळी शिवसेना आणि भाजप राज्यात आणि केंद्रात एकत्र सत्तेत होती. आता मात्र चित्र बदलले असून आज हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात असून या दोन पक्षांमध्येच रस्सिखेच असल्याने आता जसजशा निवडणूका जवळ येतील तसे आरोपांची पातळी खालावणार यात शंका नाही. भाजपला राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेने साथ सोडल्याचे शल्य आजही कायम आहे. त्यामुळे भाजप हा वचपा काढण्यासाठी साम दाम दंड भेद सर्वांचा वापर करणार, शिवसेना सोबत महाविकास आघाडीत असणाऱया काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भाजप विरोधातील भूमिका यासाठी महत्वाची ठरणार आहे. नाही तर राऊत जसे बोलले की भाजप विरोधात बोलण्याचा आम्ही एकटय़ाने ठेका घेतलाय का ? त्यात शरद पवारांची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत केलेली स्तुती आणि गोव्यात काँग्रेस नेते नाना पटोले आणि संजय राऊत यांनी एकत्र येत हम म्हणून जो फोटो सोशल मीडियावर शेअर केला. आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा 10 मार्च नंतर राजकीय भूकंप होण्याचा दिलेला इशारा आणि या सगळ्या राजकीय घटनांच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना नेते संजय राऊत भाजपची आणि केंदीय तपास यंत्रणांची काय पोलखोल करणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
प्रवीण काळे