ऑनलाईन टीम / मुंबई :
मनेस अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कृष्णकुंज येथे जाऊन भेट घेतली. या भेटीबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, मनसे आणि भाजपच्या युतीचा या भेटीत प्रस्ताव देण्यात आलेला नाही. तसेच युतीवर चर्चाही झाली नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पुढे ते म्हणाले, राज ठाकरे यांनी परप्रांतियांची भूमिका बदलल्याशिवाय चर्चा होणार नाही, असे मी गेल्या वर्षभरापासून सांगत आहे. त्यावर त्यांनी मला त्यांच्या भाषणाची क्लिप पाठवली. मी ती ऐकली आणि त्यावरून चर्चा झाली. मात्र, ही सदिच्छा भेटी होती. यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली. पण या भेटीत युतीचा प्रस्ताव नाही, असे पाटील यांनी यावेळी सांगितले.
पुढे ते म्हणाले, मागे नाशिकमध्ये आम्ही अचानक भेटलो होतो. त्यावेळी त्यांनी मला चहा प्यायला बोलावले होते. त्यामुळे मी आज त्यांना भेटलो. मागच्या भेटीत राजसाहेब म्हणाले होते की, यूपीतील माणसाला यूपीमध्ये 80 टक्के नोकऱ्या हव्या, हे मी यूपीत जाऊन म्हणेन, तसेच मी महाराष्ट्रातील मराठी मुलांना इथेच रोजगार मिळायला हवा असेही त्यांनी सांगितले. यात गैर काय आहे? असा सवालही त्यांनी केला.
राज ठाकरे तुम्ही भूमिका बदला, तुम्ही राज्याचे नेते झाले पाहिजेत मात्र मनसेची राज्यातील परिस्थिती पाहता थोडा कालावधी लागेल यासाठी मोठ्या समूहात यायला पाहिजे. असे माणूस म्हणून त्यांना सागणे हा भाग वेगळं आहे. मात्र मी भाजप प्रदेशाध्यक्ष आहे. यामुळे आज या घडीला तरी भाजप-मनसे युतीबाबत कोणताही प्रस्ताव नाही. असे स्पष्ट शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरे यांच्या भेटीनंतर नमूद केले आहे.