तहसीलदार-पोलीस निरीक्षकांचे तक्रार
खानापूर / प्रतिनिधी
रामनगर-अनमोड रस्त्यावर खानापूर तालुका हद्दीतील राजवाळ ग्रामस्थांच्या जमिनीवर अतिक्रमण करुन एक खासगी व्यक्ती नाहक त्रास करीत आहे. याची प्रत्यक्ष पाहणी करुन राजवाळ ग्रामस्थांच्या जमिनीमध्ये सुरु केलेले अतिक्रमण त्वरित काढून त्या गावातील गरीब कुटुंबांना न्याय द्यावा, अशी तक्रार भाजपच्या शिष्टमंडळानी तहसीलदार रेष्मा तालिकोटी तसेच पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली आहे. यावेळी त्यांच्यासंमवेत राजवाळ ग्रामस्थही उपस्थित होते.
रामनगर-अनमोड रस्त्यावर असलेले राजवाळ गाव खानापूर तालुक्याच्या हद्दीत येते. या गावात जवळपास 50 गवळी व मिराशी कुटुंबे गेल्या अनेक वर्षापासून वास्तव्यास आहेत. मोलमजुरी असलेले तुटपुंजी शेती तसेच जनावरे पाळून राजवळ ग्रामस्थ आपले उपजीविका भागवत आली आहेत. या गावाजवळ दहा वर्षापूर्वी एका खासगी व्यक्तीने जमीन खरेदी केली आहे. गेल्या काहीवर्षापासून सदर व्यक्ती आपल्या खासगी जमिनीबरोबरच बाजूच्या सरकारी जमिनीतही अतिक्रमन करुन राजवाळ ग्रामस्थांना नाहक त्रास देत आहेत. त्यांने आता या सर्व जमिनीला तारेचे कुंपण घातले आहेत. त्यामध्ये त्या ग्रामस्थांची घरे व जनावरे देखील अडकून राहिली आहेत. तारेच्या कुंपणामुळे त्या जनावरांकडे किंवा घराकडे जाणेदेखील राजवाळ ग्रामस्थाना कठीण झाले असून ती व्यक्ती मोठी असल्याने त्यांना राजवाळ ग्रामस्थ जाबही विचारु शकत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याची माहिती यावेळी उपस्थित असलेल्या राजवाळ ग्रामस्थांनी दिली. व आपल्याला न्याय द्यावा, अशी मागणी केली. उपस्थित भाजप नेत्यानीही हा विषय अत्यंत गंभीर असून तातडीने परिस्थितीची पाहणी करावी, व झालेले अतिक्रमण दूर करावे, अशी तहसीलदार रेष्मा तालीकोटी व पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे यांच्याकडे मागणी केली आहे. उभय अधिकाऱयांना राजवाळला प्रत्यक्ष भेट देवून परिस्थितीची पाहणी करुन ग्रामस्थाना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.
यावेळी राजवाळ ग्रामस्थासंमवेत जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर, तालुका अध्यक्ष संजय कुबल, माजी जि. पं. बाबुराव देसाई, जोतिबा रेमाणी तसेच प्रकाश गावडे, संतोष दप्तरदार, गुंडू तोपिनकट्टी यासह भाजपचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.