ऑनलाईन टीम / जयपूर :
राजस्थानातील गुज्जर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आजपासून (दि.1) आंदोलन करणार आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागू नये, या दृष्टीने 7 जिल्ह्यात राष्ट्रीय सुरक्षा कायदा (एनएसए) लागू करण्यात आला असून, इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे.
गुज्जर समाजाने यापूर्वीही आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरून हिंसक आंदोलने केली आहेत. मात्र, सरकारने वारंवार दुर्लक्ष केल्याने गुज्जर आरक्षण संघर्ष समितीने आज पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे. खबरदारी म्हणून राजस्थानातील भरतपूर, धोलपूर, सवाई, माधोपूर, दौसा, टोक, बुंदी आणि झालावाड या जिल्ह्यात राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करण्यात आला आहे. तसेच इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे.
यावेळीही हा समाज पूर्व राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील पिरुपुरा येथून आंदोलनाला सुरुवात करणार आहे. गुज्जर नेत्यांनी आंदोलनाची रणनीती जाहीर केली नसली तरी देखील दिल्ली-मुंबई रेल्वे मार्ग आणि आग्रा-बिकानेर महामार्ग क्रमांक 21 हा पहिला आंदोलनाचा मार्ग असेल. हा मार्ग जाम केल्यावर राजस्थानच्या अनेक भागांची कनेक्टिव्हिटी बंद केली जाईल, असे सांगण्यात येते.