पायटल गटाकडून फोन टॅपिंगचा आरोप
जयपूर / वृत्तसंस्था
राजस्थानात सत्ताधारी असलेल्या काँगेसमध्ये गटबाजी उफाळून आली असून ती अद्यापही सुरूच आहे. सचिन पायलट यांच्या गटाने मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर फोन टॅपिंगचा आरोप केला. त्यामुळे पुन्हा दोन्ही गटांमध्ये वादावादी सुरू झाल्याचे दिसून आले. पायलट गटाचे आमदार वेदप्रकाश सोळंकी यांनी गेहलोत गटावर फोन टॅपिंगचा आरोप करत पुन्हा वादाला तोंड फोडले आहे.
या आरोपाला गेहलोत यांच्या वतीने कठोर भाषेत प्रत्युत्तर देण्यात आले. गेहलोत यांचे निकटवर्तीय मानण्यात येणारे मंत्री प्रतापसिंग खाचरियावास यांनी पायलट गटावर उलटवार करताना फोन टॅपिंग झालेच नसल्याचा दावा केला. मात्र, कोणत्याही आमदाराला काहीही शंका अगर संशय असल्यास त्याचे निराकरण केले जाईल, असे आश्वासनही खाचरियावास यांनी पत्रकारांसमोर दिले.
केवळ एकच कारण नाही
राजस्थानात सत्ताधारी पक्षात नव्याने उफाळलेल्या बंडाला केवळ टेलिफोन टॅपिंग हे कारण नाही. मागच्या वर्षी झालेले बंड थंड करण्यासाठी पायलट गटाला अनेक आश्वासने देण्यात आली होती. त्यांपैकी एकाही आश्वासनाची पूर्तता झालेली नाही, असा त्या गटाचा आरोप आहे. पायलट गटाचा भ्रमनिरास झाला असून आता गेहलोत यांच्यावर त्याचा विश्वास उरलेला नाही, असे सांगण्यात आले.
आता लक्ष पक्षश्रेष्ठींवर
राजस्थान काँगेसमधील हा वाद दिल्लीतील पक्षश्रेष्ठींच्या दारात पोहचला असून तेच न्याय करतील अशी आशा पायलट गटाचा वाटते. परिणामी आता लक्ष दिल्लीकडे लागले आहे. गेहलोत गटाचे आमदारही पक्षश्रेष्ठींच्या संपर्कात आहेत, असे सांगण्यात आले. एकंतर परिस्थिती नियंत्रणात आलेली नसल्याचे कळते.
पंजाबमध्येही समस्या
पक्षांतर्गत ऐक्य टिकवून धरताना काँगेसची तारांबळ उडत असून पंजाबमध्येही काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात कमालीचे मतभेद निर्माण झाल्याने पक्षात फूट पडते की काय अशी स्थिती आहे. या प्रकरणातही पक्षश्रेष्ठींना लक्ष घालावे लागले असून लवकरच याचा सोक्षमोक्ष लागण्याची शक्यता पक्षाच्या सूत्रांनी पत्रकारांसमोर व्यक्त केली.