नवी दिल्ली / वृत्तसंस्था
मागच्या महिन्यात राजस्थान मंत्रिमंडळाची पुनर्रचना केल्यानंतर आता पुन्हा नाराजीचे सूर उमटू लागल्याने पुन्हा मंत्रिमंडळाची फेररचना करण्याचा संकेत त्या राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दिला आहे. मात्र, त्यांनी यासाठी निश्चित कालावधी सांगितलेला नाही. पण येत्या काही काळातच ही फेररचना शक्य आहे.
राजस्थान सरकार संकटात असताना काँगेसबाहेरच्या अनेक आमदारांनी आम्हाला मोलाचे साहाय्य केले आहे. त्यांना मागच्या मंत्रिमंडळ फेररचनेत सामावून घेता आलेले नाही. त्यांना संधी देणे आवश्यक आहे. परिणामी, पुन्हा मंत्रिमंडळाची फेररचना करावी लागेल, असे प्रतिपादन गेहलोत यांनी केले.
फेररचना होऊनही नाराजीचे सूर पुन्हा उमटू लागले आहेत. सचिन पायलट गटाचे काही नेते अद्यापही नाराज असल्याची माहिती आहे. असंतुष्टांची संख्या वाढत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. परिणामी आणखी एकदा मंत्रिमंडळ विस्तार किंवा फेररचना करावी लागेल, असेही बोलले जाते. तथापि, या वृत्तांना अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. सचिन पायलट यांनीही अद्याप या वृत्तांवर प्रतिक्रिया व्यक्त केलेली नसल्याने स्थिती अनिश्चित असल्याचे बोलले जाते.