दिगंबर कामत दिल्लीतून परतले राजीनामा वगळता अन्य विषयांवरच चर्चा
प्रतिनिधी/ पणजी
काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या रंगलेल्या राजीनामानाटय़ावर पडदा टाकण्यासाठी दिल्लीस गेलेले विरोधी पक्षनेते दिगंबर कामत व गिरीश चोडणकर यांनी पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. परंतु नेते राहूल गांधी विदेशात असल्यामुळे राजीनाम्याचा मुख्य मुद्दा जैसे थेच राहिला. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सध्यातरी चोडणकर यांच्याच खांद्यावर राहिली आहे.
दिल्लीतून परतलेल्या श्री. कामत यांनी नंतर पत्रकारांना वरील माहिती दिली. या भेटीत चोडणकरांच्या राजीनाम्यावर कोणतीही चर्चा झाली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव यांच्यासह त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेतली. त्या भेटीत प्रामुख्याने जिल्हा पंचायत निवडणुकीतील निकालासंबंधी चर्चा झाली. तसेच सदस्य नोंदणी मोहीम आणि बुथ समित्यांची फेरबांधणी यासारखे अन्य संघटनात्मक विषयही चर्चेस आले. त्यासंबंधी आपण सर्व माहिती दिली, असे श्री. कामत यांनी सांगितले.
नुकत्याच झालेल्या जिल्हा पंचाय निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर त्याची जबाबदारी घेत गेल्या पंधरवडय़ात चोडणकर यांनी राजीनामा सादर केला होता. मात्र त्याच दरम्यान राहूल गांधी विदेशात गेल्यामुळे रविवारपर्यंत राजीनाम्यावर निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे गोव्यात काँग्रेसचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात गोंधळाचे वातावरण आहे. या गोंधळाचा परिणाम म्हणून पक्षकार्यही थांबलेले आहे.
दरम्यान, दिगंबर कामत यांनी प्रदेशाध्यक्षपद स्वीकारावे अशी अनेक काँग्रेसजनांची इच्छा आहे. परंतु त्यादृष्टीने सध्यातरी कामत यांची मानसिक तयारी नसल्याचे एकुणच परिस्थितीवरून दिसून येत आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सध्यातरी चोडणकर यांच्याकडेच राहिली आहे.