वार्ताहर / दिघंची
आटपाडी तालुक्यातील राजेवाडी येथील ब्रिटिशकालीन राजेवाडी तलाव यावर्षीदेखील पूर्ण क्षमतेने भरला आहे. शुक्रवारी राजेवाडी तलावाच्या सांडव्यावरुन पाणी वाहू लागले. मागील वर्षी देखील राजेवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरले होते. सलग दुसऱ्यावर्षी तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.
सुमारे 150 वर्षांपूर्वी ब्रिटिश राणी व्हिक्टोरिया यांनी या तलावाची निर्मिती केली होती. 2011 ते 2019 हा तलाव पाण्याअभावी कोरडा ठणठणीत होता. त्यानंतर ऑक्टोबर 2019 मध्ये हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला होता व यावर्षी देखील निसर्गाच्या कृपेने राजेवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. या तलावाचे पात्र सातारा जिल्ह्यात येते व याचा सांडवा हा सांगली जिल्हा हद्दीत येतो तर पाण्याचा बराचसा वापर हा सोलापूर जिल्हयातील गावाना होतो. या तलावाला उजवा व डावा असे दोन कालवे आहेत. पैकी सोलापूर जिल्ह्याकडे जाणाऱ्या उजव्या कालव्याचे काम पूर्ण झाले आहे. तर आटपाडी तालुक्याकडे येणाऱ्या डाव्या कालव्याचे काम अजूनही अपूर्णच आहे.
मागील वर्षी 10 वर्षांनी तलाव भरल्यामुळे नागरिकांची मोठी गर्दी केली होती. एखाद्या पर्यटन स्थळाचे रूप यावेळी आले होते. आटपाडी तालुक्यासह सातारा, सोलापूर जिल्हा हद्दीवरील अनेक गावच्या नागरिकांनी यावेळी गर्दी केली होती. नागरिकांची गर्दी पाहता तलाव परिसर गर्दीने फुलून गेल्याचे चित्र मागील वर्षी होते. नागरिकांची गर्दी पाहता त्या भागातील चिलार व काटेरी झुडपे काढण्यासाठी व तलाव परिसर स्वच्छतेसाठी आमदार अनिलभाऊ बाबर यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले होते.
राजेवाडी तलाव भरल्यानंतर सांडव्यावरून वाहणारे पाणी म्हणजे दुष्काळी आटपाडी तालुक्यातील नागरिकांना एक पर्वणीच असते. ब्रिटिशकालीन तलाव असल्याने राजेवाडी तलावाची इतिहासात नोंद आहे. त्यामुळे राजेवाडी तलावाची वेगळी ओळख आहे.सलग दुसऱ्या वर्षी तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने या तलावाच्या पाण्यावर अवलंबून असणारा शेतकरी वर्ग मात्र सुखावला आहे.