मुंबई/प्रतिनिधी
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना ठाकरे सरकारने सरकारी विमानानं प्रवास करायला परवानगी नाकारल्याची माहिती समोर आली असून यावरुन भाजपा नेते आक्रमक झाले आहेत. दरम्यान राज्यपाल उत्तराखंडला जात असताना हा प्रकार घडला. राज्यपाल विमानात बसेपर्यंत जाणीवपूर्वक परवानगी देण्यात आली नसल्याचा आरोप विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. दरम्यान मुख्यमंत्री कार्यालयाने बुधवारी रात्रीच राज्यपाल कार्यालयाला राज्यपालांना विमान प्रवास करण्यास परवानगी नाकरल्याची माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
दरम्यान फडणवीस यांनी हा अत्यंत दुर्दैवी प्रकार असून महाराष्ट्रात याआधी असं कधीच घडलेलं नाही. राज्यपाल ही व्यक्ती नसून पद आहे. व्यक्ती येतात आणि जातात. राज्यपाल हेच राज्याचे प्रमुख असतात. राज्यपाल मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळ नेमतात असं आपल्या संविधानानं सांगितलं आहे. राज्यपालांना राज्य सरकारचं विमान वापरायचं असेल तर जीएडीला एक पत्र पाठवावं लागतं आणि नंतर परवानगी मिळते अशी पद्धत आहे. मला माहिती मिळाल्याप्रमाणे अशाप्रकारे पूर्ण कार्यक्रम जीएडीला गेला. मुख्य सचिवांना याची माहिती होती, फाईल मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली आहे. पण जाणीवपूर्वक राज्यपाल विमानात बसेपर्यंत परवानगी देण्यात आली नाही. राज्यपालांना विमानातून उतरावं लागलं हा पोरखेळ आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.