नवी दिल्ली / वृत्तसंस्था
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरून वादाची ठिणगी पडली असतानाच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही राज्यपालांच्या भाषा आणि शब्दरचनेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. कोश्यारी यांनी लिहिलेल्या पत्रात काही अनावश्यक शब्द असून ते टाळता आले असते, असे वक्तव्य शहा यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीवेळी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अलीकडेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यातील मंदिरे अनलॉक करण्याच्या मुद्दय़ावरून पत्र लिहिले होते. या पत्राला उद्धव ठाकरे यांनीही ‘ठाकरे शैली’त प्रत्युत्तर दिल्यामुळे द्वयींमधील वाद चांगलाच भडकला होता. या वादग्रस्त पत्राबाबत आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाष्य करत “राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आपल्या शब्दांचा अधिक चांगल्या पद्धतीने वापर करु शकले असते’’ असे म्हटले आहे. ‘तुम्ही धर्मनिरपेक्ष झालात का?’ असा प्रश्न कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे विचारला होता. यासंबंधी मुलाखतीमध्ये अमित शहा यांना “कोश्यारी यांच्या पत्राकडे भाजपचे नेतृत्त्व कोणत्या दृष्टीकोनातून पाहते’’ असा प्रश्न करण्यात आला. त्यावर अमित शहा यांनी “मी पत्र वाचले असून त्यांनी काही शब्द टाळले असते तर वादच उद्भवला नसता’’ असे स्पष्टीकरण दिले आहे.
राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात काही वादग्रस्त शब्दरचना आढळल्याने बहुतांश जणांनी राज्यपालांच्या भूमिकेवर टीका केली होती. एकीकडे बार, रेस्टॉरंटना सरकारकडून मुभा दिली जात असताना देवी-देवतांना मात्र अजूनही लॉकडाऊनमध्येच ठेवले गेले आहे, असा उल्लेख पत्रामध्ये करण्यात आला होता. तसेच तुम्ही हिंदुत्वाचे कट्टर समर्थक आहात. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर तुम्ही अयोध्येलाही गेला होता. तुम्ही पंढरपूरला जाऊन विठ्ठल- रुक्मिणीची पूजा केली होती, असे दाखलेही पत्रात देण्यात आले होते. अनेक राज्यात मंदिरे खुली करण्यात आली असून, महाराष्ट्रातही कोरोना मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करून मंदिरे खुली करण्यात यावी, अशी मागणी राज्यपालांनी पत्रात केली होती. या पत्राला उद्धव ठाकरे यांनी दिलेले उत्तरही सडेतोड स्वरुपाचे होते. ‘माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची गरज नाही, मी मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱयांचे हसून स्वागत करत नाही’’ असे उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना ठणकावले होते.