ऑनलाईन टीम
MPSC ची 14 मार्चला होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द झाल्यानंतर राज्यभरातील विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त होत होता. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. परीक्षा रद्द करण्यात आली नसून ती पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षा आठवडाभराच्या आतच होणार असून निश्चित तारीख उद्या दि. १२ मार्च रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.
फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेशी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी येत्या आठ दिवसांच्या आत MPSC ची पूर्व परीक्षा घेतली जाईल आणि त्याच्या तारखेची घोषणा १२ मार्च म्हणजे शुक्रवारी जाहीर केली जाईल, असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. तसेच विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री ठाकरे यांनी आणखी एक दिलासा दिला आहे. MPSC परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांना वयोमर्यादा उलटून जाण्याची भिती वाटत आहे. परंतु, परीक्षा देताना विद्यार्थ्यांना वयोमर्यादा आडवी येणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
कुणी भडकवतोय म्हणून भडकू नका : मुख्यमंत्री
राज्यातील विद्यार्थी अनेक दिवसांपासून परिश्रम करुन अभ्यास करत आहेत. ही परीक्षा केवळ काही दिवसांसाठी पुढे ढकलली आहे. मी स्वत: मुख्य सचिवांना आणि एमपीएससीच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. परीक्षेची तारीख पुढच्या आठ दिवसातीलच असणार आहे. उगाच कोणी भडकवतोय म्हणून भडकून जाऊ नका. आपला अभ्यास सुरु ठेवा. मी तुम्हाला वचन देतो की, येत्या आठवड्याभरात परीक्षा होईल, अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.
म्हणून परीक्षा पुढे ढकलली : मुख्यमंत्री
MPSC परीक्षेसाठी संपूर्ण शासकीय यंत्रणा कार्यरत असते. त्यामुळे काही शासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या आरोग्याबाबत काळजी घ्यावी लागणार आहे. त्यांना बसण्याची सोय कुठे आहे. ती व्यवस्था कशी आहे, पेपर वाटण्यापासून ते पेपर तपासण्यापर्यंत सर्व बाबींसाठी कर्मचारी वर्ग लागतो. कोरोनाचा राक्षस पुन्हा डोकं वर काढतोय तो काढत असताना जे कर्मचारी माझ्या विद्यार्थ्यांच्या सोबत असतील त्यांची तपासणी करणं गरजेचे आहे. निगेटिव्ह असलेले कर्मचारीच या परीक्षेसाठी कार्यरत असावेत हा माझा आग्रह आहे. आणि तशा माझ्या सूचना आहेत. त्यामुळे विद्यार्थी परीक्षेला आल्यानंतर तो कोणत्याही परिस्थितीत दडपणाखाली येऊ नये, आपल्याला पेपर वाटणारे हात कोरोनाबाधित नसेल ना अशी शंका मनात असता कामा नये म्हणूनच ही तारीख पुढे ढकलण्याची आल्याची माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली.