पाचजण विदेशातून परतलेले पैकी चौघे जहाजावरील कर्मचारी, पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांची माहिती
प्रतिनिधी/ पणजी
राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत आणखी एकाने वा झाली आहे. गेले काही दिवस राज्यात विलगिकरण करून घेतलेल्या व विदेशातून बोटीवर काम करून परतलेल्या व्यक्तीची चाचणी सकारात्मक आली आहे. यामुळे आता गोव्यात सकारात्मक कोविड-19 च्या रुग्णांची संख्या 6 झाली आहे. राज्यात आतापर्यंत 1 हजार व्यक्ती विलगिकरणामध्ये आहेत. तर सकारात्मक असलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 173 जणांची चाचणी नकारात्मक आलेली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
आल्तिनो येथे आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, आतापर्यंत कोरोनाची राज्यात 5 प्रकरणे सकारात्मक होती. त्यात आणखी एका रुग्णाची भर पडली. सदर व्यक्ती 19 मार्च रोजी गोव्यात आली. तो विदेशात बोटीवर होता व आल्या आल्या त्याने स्वतःला विलगिकरण करून घेतले. त्याच्या चाचणीत तो सकारात्मक आढळला. सदर व्यक्तीच्या संपर्कात अन्य पाच जण आले होते. त्या सर्वांचा तपासणी करणार अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
आडवाटेने आल्यास कारवाई मुख्यमंत्र्यांचा इशारा
सध्या राज्यात लॉकडाऊन चालू आहे. या काळात गोव्यातून कोणी बाहेर जाऊ नये. त्याच बरोबर गोव्यात सीमा ओलांडून येऊ नये. सध्या काहीजण विविध मार्गाने गोव्यात येण्याचा प्रयत्न करत आहेत. हा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. त्याचबरोबर आड मार्गाने गोव्यात येण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्या विरुद्ध कडक कारवाई करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱयांना प्राप्त आहे. अत्यंत गरजुवंत असेल तर संबंधिताने जिल्हाधिकाऱयांकडे अर्ज करावा व तशीच गरज असेल तर अशा व्यक्तीलाच गोव्यात प्रवेश दिला जाईल ते देखील तपासणी करून, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
शेती, काजूकामासाठी बाहेरून कामगार आणू नका
भातपीक कापणी असो वा काजू गोळा करण्यासाठी गोव्याबाहेरून मजूर बोलावू नका. सध्या जे मजूर गोव्यात आहेत त्यांचाच वापर करा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. गोव्यात भाजीपाला व अन्नधान्य घेऊन येणाऱया ट्रक चालकांची तपासणी त्यांच्या डोळ्यासमोर थर्मल गन द्वारे केली जात आहे. एका ट्रकबरोबर एक अतिरिक्त चालकालाच गोव्यात प्रवेश दिला जात असल्याचे ते म्हणाले.
राज्यात सध्या 1 हजार व्यक्तिंना विलगिकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांनी घराबाहेर पडू नये. गोव्यात सध्या जी काही विदेशी माणसे आहेत ती बरेच दिवस अगोदर येऊन राहिलेली आहेत. 19 मार्च नंतर गोव्यात कोणीही आलेले नाहीत व कोणी विदेशातून आलेल्यांची छळवणूक करू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
राज्यात जे 6 रुग्ण सकारात्मक सापडले त्यातील 5 जण विदेशातून आलेले. त्यातल्या त्यातील 4 जण हे बोटीवर सेवेत होते. 1 व्यक्ती हा अगोदर सकारात्मक सापडला होता त्याचाच भाऊ होता. विदेशातून आलेल्या व्यक्तींपासून कोरोना होताय हा गैरसमज दूर केला पाहिजे, असे ते म्हणाले.
राज्यात कोरोनाचे एकूण 197 जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यातील 173 हे सकारात्मक आलेल्यांच्या संपर्कात आलेले. तरीही त्यांचे अहवाल नकारात्मक आहे. असे असले तरी देखील त्यांना काही दिवस घरांमध्ये विलगिकरणासाठी ठेवले जाईल. जे सकारात्मक आहेत त्यांची तपासणी दोन वेळा केली जाणार आहे.
राज्यात तबलिगींची 2500 कुटुंबे!
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पोलिसांचा हवाला देऊन एक धक्कादायक माहिती दिली. ते म्हणाले की, राज्यात तबलिगींशी संपर्कात आलेली 2500 पुटुंब आहेत. पोलिसांनी या सर्वांची माहिती मिळविलेली आहे. ज्या 46 तबलिगींची पाहणी केली जे दिल्ली परिषदेत सहभागी होऊन गोव्यात परतले होते त्यातील 8 जण हे फेब्रुवारी मध्येच जाऊन आलेले. आणि एकूण 46 पैकी 4 जणांची गोव्यात घरे आहेत. या सर्वांचीच गोवा सरकार चाचणी घेणार अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यात जे कोरोनाचे रुग्ण आहेत त्या सर्वांची प्रकृती सुधारत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सकारात्मक रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी एकतर स्वतःला विलगिकरण करून घ्यावे किंवा तपासणी तरी करून घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
मासळीविक्रीबाबत तडजोड नाही
राज्यात मासळी विक्रीवर बंदी घातलेली नाही. परंतु मासळी दिसताच अनेकजण गर्दी करून तुटून पडतात. आपल्याला देखील मासे आवडतात, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, मासळी विक्रेत्यांनी ती विकताना योग्य सामाजिक अंतर ठेवावे. अन्यथा मासळीच्या प्रेमापोटी राज्यात कोरोनाचा फैलाव मोठय़ा प्रमाणात होऊ शकतो.
मंत्री मिलिंद नाईक यांचे 6 महिन्यांचे वेतन
कोरोना निधीसाठी जनतेने सढळहस्ते मदत करावी, सर्व मंत्री 1 महिन्यांचे वेतन देणार आहेत. मंत्री मिलिंद नाईक यांनी सहा महिन्यांचे वेतन देणार असल्याचे जाहीर केले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच राज्यातील एनआयटीच्या सर्व कर्मचारी व अधिकारी वर्गाने प्रत्येकी दोन दिवसांचे वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. यातील 1 दिवसाचे वेतन मुख्यमंत्री निधीत तर उर्वरित प्रधानमंत्री निधीत समाविष्ट करण्याचे ठरविले आहे.