काँग्रेसचा इशारा पंधरा दिवसांची मुदत
प्रतिनिधी/पणजी
राज्यातील अनेक रस्ते म्हणजे मृत्यूचा सापळा बनलेले आहेत. राष्ट्रीय महामार्ग तसेच राज्यमहामार्गावरील परिस्थिती बिकट बनलेली आहे. पंधरा दिवसांच्या आत हे रस्ते दुरुस्त न केल्यास आंदोलन करू असा इशारा काँग्रेस युवा मोर्चाने दिला आहे. याबाबच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुख्य अभियंत्याला काँग्रेसने निवेदन सादर केले आहे.
आल्तीनो येथील सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता डी. सी. गुप्ता यांची काँग्रेस कार्यकर्त्यांनी भेट घेतली व निवेदन सादर केले. यावेळी काँग्रेस युवा मोर्चाचे अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, जना भंडारी, हिमांशू तिवरेकर, अर्चीत नाईक व अन्य उपस्थित होते.
वाहन अपघातांची संख्या वाढत असून त्याचे मुख्य कारण म्हणजे राज्यातील खराब रस्ते. रस्ते व्यवस्थित नसल्याने अनेक वाहन चालकांना आपले प्राण गमवावे लागत आहे. राज्यात पर्यटक येतात आणि ते भाडय़ाच्या दुचाकी घेऊन फिरत असतात. रस्ते खराब असल्याने पर्यटकांनाही अपघातांना सामोरे जावे लागत आहे. काँग्रेस पक्ष सरकारला पंधरा दिवसांची मुदत देत आहे, पंधरा दिवसांच्या आता रस्ते दुरुस्त न केल्यास आंदोलन उभारणार, असा इशारा काँग्रेसने दिला आहे.