राज्यातील रुग्णांची संख्या २०३ वर, दोघांचा मृत्यू
तरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूर
राज्यात आज रविवारी आणखी २२ कोरोना (कोविड १९) रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या २०३ झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये सर्वाधिक १० रुग्ण मुंबईचे आहेत तर ५ रुग्ण पुण्याचे, ३ नागपूरचे, २ अहमदनगरचे तर सांगली, बुलढाणा आणि जळगाव येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. दरम्यान करोना आजारातून बरे झालेल्या एकूण ३५ रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले असल्याची माहिती राज्य सर्व्हेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली.
तर दोन कोरोना बाधित रुग्णांचे मृत्यू झाले. एका ४० वर्षीय महिलेचा काल, के ई एम रुग्णालयात तीव्र श्वसनावरोधामुळे मृत्यू झाला होता. ती कोरोना बाधित असल्याचे आज स्पष्ट झाले. तर, बुलढाणा येथे एका ४५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला तो मधुमेही होता. राज्यातील कोरोना बाधित मृत्यूची संख्या आता ८ झाली आहे.
राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्ण पुढीलप्रमाणे
जिल्हा / मनपा, बाधित रुग्ण-मृत्यू
१ मुंबई – ८५-६
२ पुणे( शहर व ग्रामीण भाग) -३७-०
३ सांगली – २५-०
४ मुंबई वगळून ठाणे मंडळातील इतर मनपा – २३-१
५ नागपूर – १४-०
६ यवतमाळ – ४-०
७ अहमदनगर – ५-०
८ सातारा -२-०
९ औरंगाबाद, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, गोंदिया, जळगाव, बुलढाणा प्रत्येकी १ – १ ( बुलढाणा)
१० इतर राज्य – गुजरात -१-०
एकूण – २०३- ८
मुंबई कार्यक्षेत्रातील मृत्यू
राज्यात आज एकूण ३९४ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत ४२१० जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी ३४५३ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २०३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ३५ करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात १७,१५१ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ९६० जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.
नवीन करोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.