वेंगुर्ले, मालवणातील मच्छीमारांकडून घेतली सोयी-सुविधांची माहिती
मालवण:
सिंधुदुर्ग ते पालघरपर्यंतच्या समुद्र किनारी असलेली एकूण 173 लहान-मोठी बंदरे अर्थात मासळी उतरविण्याच्या केंदांवर कोणकोणत्या सोयी-सुविधा आहेत, यासंबंधीचा सर्व्हे मत्स्य विभागाने सुरू केला आहे. त्याकरिता मत्स्य विभागाच्या मुख्य कार्यालयाने नियुक्त केलेल्या संबंधित संस्थेच्या टीमने गेले दोन दिवस मालवण आणि वेंगुर्ले तालुक्यातील सर्व्हे पूर्ण केला. शुक्रवारी ही टीम देवगडातील बंदरांची पाहणी करून तेथील मच्छीमारांकडून माहिती घेणार आहे. या संस्थेकडे बंदरांची माहिती देणारा ऍप बनविण्याचे काम सोपविण्यात आल्याचे मत्स्य विभागाकडून सांगण्यात आले.
गुरुवारी मालवण तालुक्यातील मासळी उतरविण्याच्या केंद्रांची पाहणी करून तेथील मच्छीमारांकडून माहिती घेतली. मत्स्य विभागातील सागर सुरक्षा रक्षक त्यांच्यासमवेत उपस्थित होते. मासळी उतरविण्याच्या केंद्राजवळ आवश्यक सोयी-सुविधा जसे की बर्फ कारखाना, प्रशस्त जेटी व बाजारपेठ, मुबलक पाण्याची सोय, बोट दुरुस्तीसाठी जागा, शौचालय, आपत्कालीन टीम आणि केंद्र, मासळीवर प्रक्रिया केंद्र, शीतगृह, लीलाव गृह, जाळी दुरुस्ती, इंधन पंप, बाजारपेठ, सौर ऊर्जा किंवा इलेक्ट्रिक पथदीप, कचरा व सांडपाणी व्यवस्थापन, प्रशस्त पार्किंग आदी सोयी-सुविधा आहेत किंवा नाहीत, याविषयीची माहिती या टीमकडून संकलित करण्यात आली.
पर्यटनदृष्टय़ा लाभ होऊ शकतो
जिल्हय़ातील लहान-मोठय़ा सर्वच मासळी उतरविण्याच्या केंद्रांवर अनेक सोयी-सुविधांची नितांत आवश्यकता आहे. पण असे सर्व्हे वारंवार होत राहतात. परंतु प्रत्यक्षात सोयी-सुविधा पुरविल्या जात नाहीत. संबंधित एजन्सीकडून घेतली जाणारी माहिती पाहता, भविष्यात शासनामार्फत जर बंदरांच्या ठिकाणी अशा सोयी-सुविधा उपलब्ध झाल्यास भविष्यात पर्यटनदृष्टय़ाही त्याचा लाभ स्थानिकांना हेऊ शकतो. परंतु प्रत्यक्षात सोयी-सुविधा उभ्या राहणार का, की वर्षानुवर्षे फक्त सर्व्हेच केले जाणार, असा सवाल मच्छीमारांनी उपस्थित केला.