तापमान 37.8 डि. से. वर : ‘सन स्ट्रोक’ने आजारी पडण्याची भीती
प्रतिनिधी /पणजी
राज्यात उष्णतेची तीव्र लाट सुरू झाली आहे. रविवारी राज्यात 37.4 डि. से. एवढे तापमान झाल्यानंतर उकाडय़ाची अक्षरशः लाट पसरली. सोमवारी त्यावर आणखी वाढ झाली व दुपारी तापमान 37.8 डि. से. एवढे झाले. गेल्या काही वर्षांमध्ये एवढे तापमान वाढले नव्हते. हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा प्रभाव आणखी काही दिवस रहाण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
राज्यात उकाडा असहय़ झाला आहे. अंगाची लाही लाही झाली आहे. रविवारी तापमान 37.4 डि. से. पर्यंत पोहोचले तर सोमवारी तापमान 37.8 डि. से. पर्यंत पोहोचले. सरासरीच्या तुलनेत 5.9 डि. से. ने तापमान वाढले आहे.
हवामान खात्याच्या अधिकाऱयांनी सांगितले की, यापूर्वी 13 वेळा गोव्यात 37.8 डि. से. एवढे तापमान वाढले होते. यंदा मात्र प्रथमच एवढे तापमान वाढले आहे. 12 मार्च 1979 मध्ये गोव्यातील तापमान हे 39 डि. से. एवढे वाढले होते. वाढत्या तापमानाचा राज्यातील जनतेच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील ज्येष्ठ डॉक्टर शेखर साळकर यांनी जनतेला उष्णतेच्या लाटेचा परिणाम होऊ नये यासाठी खबरदारीचे उपाय हाती घ्या, भरपूर पाणी प्या, प्रकृतीची काळजी घ्या, असे आवाहन केले आहे. आजही राज्यात 37 डि. से.च्या पेक्षाही पारा वर जाण्याची शक्यता आहे. काहीजणांना उन्हाचे चटके बसू शकतात.
मुलांना लवकर घरी सोडणे गरजेचे
दरम्यान, उष्णतेची लाट लक्षात घेऊन सरकारने शाळांच्या वेळेमध्ये बदल करून दुपारी 1 वा. सोडणाऱया शाळा सकाळी 11.30 वा. किंवा 12 वा. पर्यंत सोडणे आवश्यक आहे. मुलांना या उष्णतेच्या लाटेचा फटका बसू शकतो. सनस्ट्रोकने अनेक जण आजारी पडण्याची भीती आहे. दुपारीच उन्हाचे जबरदस्त चटके बसत असल्याने हा प्रभाव कमी होईपर्यंत पुढील दोन ते तीन दिवस मुलांना लवकर घरी जाऊ देणे गरजेचे आहे. उन्हाळा सुरु होण्या अगोदर मार्चमध्ये दरवर्षी पहिल्या वा दुसऱया आठवडय़ात उष्णतेची लाट सुरु होते. पारा बराच वर जातो. हा उकाडा असहय़ ठरतो. या उष्णतेच्या लाटेचा प्रभाव पुढील दोन ते तीन दिवस राहील असा अंदाज आहे.