कोल्हापूर प्रवीण देसाई
देशबांधवांच्या रक्षणासाठी सीमेवर आपल्या छातीचा कोट करुन लढणाऱ्या सैनिकांबरोबर माजी सैनिक व त्यांच्या कुटूंबियांचे प्रश्न वेळेत मार्गी लागणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण राज्यातील तब्बल 23 जिह्यांची जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पदे रिक्त आहेत. या ठिकाणी उपजिल्हाधिकार्यांकडे प्रभारी पदभार दिला आहे. त्यामुळे या जिह्यांसाठी पूर्णवेळ जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लवकर मिळावा, अशी मागणी होत आहे.
महाराष्ट्रातील 36 जिह्यांपैकी 23 जिह्यात पूर्णवेळ जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नाही. यामध्ये प्रामुख्याने कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, पुणे, अहमदनगर, नागपूर, नाशिक, ठाणे आदी मोठय़ा जिल्हयांचा समावेश आहे. या जिह्यातील माजी सैनिकांची संख्या अंदाजे 20 हजारांच्या पुढे आहे. या उलट 4 ते 5 हजार माजी सैनिकांची संख्या असणार्या छोटय़ा जिह्यात मात्र पूर्णवेळ जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आहे. मोठय़ा जिह्यांना पूर्णवेळ जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नसल्याने माजी सैनिकांचे प्रश्न गतिने मार्गी लागत नसल्याचे दिसत आहे. तसेच ज्या जिल्हयांमध्ये पूर्णवेळ सैनिक कल्याण अधिकारी नाहीत, तेथील काम थांबलेले नाही. या ठिकाणी प्रभारी म्हणून जबाबदारी असलेले उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी आपल्यापरीने या कामाला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु ज्या गतीने काम व्हायला हवे तसे होत नसल्याचे दिसत आहे. यासाठी लवकरात लवकर रिक्त असलेलली पूर्णवेळ जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पदे भरावीत, अशी मागणी होत आहे.
मोठ्य़ा जिह्यांत तरी पूर्णवेळ अधिकारी असावा
सध्या शासनस्तरावर पदभरतीची प्रक्रिया सुरु आहे. ही भरती होईल तेव्हा होईल, परंतु तो पर्यंत प्रामुख्याने कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, पुणे, अहमदनगर, नागपूर, नाशिक, ठाणे आदी मोठय़ा जिल्हयांमध्ये तरी उपलब्ध असलेल्या जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नेमून माजी सैनिकांना न्याय द्यावा. तसेच उर्वरीत जिह्यांमध्ये उपजिल्हाधिकारी यांच्याकडे प्रभारी पद द्यावे, असा सूर उमटत आहे.
राज्यात रिक्त असलेल्या जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पदासाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. यासंदर्भातील प्रस्ताव राज्य शासनाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (एमपीएससी)कडे पाठविण्यात आला आहे. त्यांच्याकडून मुलाखती घेऊन लवकरच ही पदे भरली जातील, अशी अपेक्षा आहे.
प्रमोद यादव, संचालक, राज्य सैनिक कल्याण विभाग, पुणे
पदे रिक्त असलेले 23 जिल्हे
कोल्हापूर, सांगली, पुणे, अहमदनगर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, सोलापूर, सिंधुदर्गु, रत्नागिरी, जळगाव, बीड, जालना, लातूर, नागपूर, वाशिम, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा-गोंदीया, धुळे-नंदुरबार, नांदेड-परभणी, ठाणे-पालघर आदी जिह्यात सैनिक कल्याण अधिकारी पदे रिक्त आहेत.
काही ठिकाणी दोन जिह्यांसाठी एक अधिकारी
राज्यातील काही पदांची रचना ही दोन जिह्यांसाठी एक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अशी करण्यात आली आहे. यातील बहुतांश जिल्हे हे भौगोलिकदृष्टया, लोकसंख्या, व माजी सैनिकांची कमी संख्या असलेले आहेत. यामुळे या दान जिह्यांसाठी एक अधिकारी आहे. उदा. भंडारा-गोंदीया, धुळे-नंदुरबार, नांदेड-परभणी, ठाणे-पालघर आदी जिह्यांचा यामध्ये समावेश आहे.