मुख्यमंत्र्यांकडून प्रशासकीय यंत्रणेला दक्ष राहण्याचे आदेश
प्रतिनिधी/ पणजी
गेल्या 24 तासात राज्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस झाला. सत्तरी आणि डिचोली तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. आजपासून सलग तीन दिवस हवामान खात्याने मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर तीन दिवसांकरिता रेड अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, आजपासून मुसळधार पाऊस पडण्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जनतेला सावध राहावे, असे आवाहन केले आहे तर प्रशासकीय यंत्रणेला सज्ज राहाण्याचाही आदेश दिला आहे.
ओरिसातील कमी दाबाच्या पट्टय़ाचा परिणाम म्हणून मोठय़ा प्रमाणात पावसाचे ढग हे पूर्वेकडून गोव्याच्या दिशेने सरकत असल्याने आजपासून सलग तीन दिवस गोव्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. शनिवारी या पार्श्वभूमीवर सत्तरी, सांखळी व आसपासच्या परिसरात दुपारपासून सायंकाळपर्यंत मुसळधार पाऊस झाला. यातून नद्यांच्या पाण्याच्या पातळीत किंचित वाढ झाली. हा पाऊस असाच पडत राहिला तर पुन्हा पूर येण्याची भीती अनेकांना वाटली. तथापि, तीन तासानंतर पावसाचा जोर ओसरला.
एवढे दिवस पश्चिमेकडून पूर्वेच्या दिशेने पावसाचे ढग सरकत होते. आता सध्या पडणारा पाऊस हा परतीच्या प्रवासाचा असावा. दररोज दुपारी तो सुरु होतो व मुसळधार पडतोय. आजपासून तीन दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हा पाऊस देखील पूर्वेकडूनच येत असल्याने डिचोली, सत्तरी, सांगे, केपे व फोंडय़ाच्या काही भागात तसेच घाट माथ्यावर देखील मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने वाढत्या पावसाचा धोका लक्षात घेऊन राज्यात रेड अलर्ट जारी केला आहे. या दरम्यान, जोरदार वादळी वारे वाहाण्याची भीती असल्याने मच्छीमाऱयांना खोल समुद्रात जाऊ नये असा इशारा दिला आहे. पणजी वगळता इतर भागात गेल्या 24 तासांत जोरदार पाऊस झाला.
गेल्या 24 तासात सर्वाधिक तीन इंच पाऊस जुने गोवेत पडला. पेडणेत 1.5 इंच, फोंडा येथे दीड इंच, पणजी 1 इंच, म्हापसा अडीज इंच, सांखळीत अर्धा इंच, वाळपईत 1 से.मी. पेक्षाही कमी, काणकोण 1.5 इंच, मडगावात 2 इंच, केपेमध्ये दोन इंच, सांगेत 1.5 इंच व मुरगावात 2 इंच पावसाची नोंद झाली.
हेल्पलाईनवर संपर्क साधा
दरम्यान, हवामान खात्याने पुढील 48 तासात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली असून त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्य प्रशासकीय यंत्रणेस दक्ष राहण्याचे आदेश दिले आहेत.
या पावसामुळे कोणतीही अघटीत घडना घडल्यास त्वरित खबरदारीच्या सर्व उपाययोजना करा, कृती आणि मदत करा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर लोकांनीही दक्ष राहावे, तसेच कोणत्याही गंभीर प्रसंगास तोंड द्यावे लागल्यास 08322225383 (उत्तर) आणि 08322794100 (दक्षिण) या जिल्हाधिकारी हेल्पलाईनवर त्वरित संपर्क करावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.