मुंबई/प्रतिनिधी
भारतीय हवामान विभागानं पुढील चार दिवसांसाठी राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. दरम्यान, राज्यात गेल्या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे मराठवाड्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यानंतर मात्र पावसाने एक-दोन दिवस उसंत घेतली. आता परत येत्या चार ते पाच दिवसांत महाराष्ट्रात पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावासाचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
दरम्यान, येत्या ४८ तासांत उत्तर आणि उत्तर मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच पुढील चार ते पाच दिवसांत राज्यात बहुतेक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. यात मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद होऊ शकते.
५ सप्टेंबरला रत्नागिरी, सिंधुदुर्गला इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून उद्यासाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर सातारा, पुणे, रायगड, कोल्हापूर, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर अमरावती, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्याता वर्तविण्यात आली आहे.
राज्यात ७ सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडसह ठाणे, पालघर, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, जालना अशा राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर अहमदनगर, बीड, परभणी, अकोला, अमरावती, यवतमाळ, नांदेड, बुलढाणा, हिंगोळीमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसणार आहे. कोकणत पुढील चारही दिवस पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे सागरी किनारपट्टी भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.