ऑनलाईन टीम / मुंबई :
दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने जगभरातील देशांची चिंता वाढवली आहे. खबरदारी म्हणून भारतानेही ओमिक्रॉन व्हेरिएंट सापडलेल्या 13 देशातील प्रवाशांना सक्तीचे क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यातील प्रशासन यंत्रणेला सतर्क केले असून, नव्या संसर्गाविरोधात कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आज मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली आहे.
या बैठकीला राज्याचे आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, कोरोना टास्क फोर्सचे सदस्यही उपस्थित असतील. बैठकीत कोरोनाच्या नव्या संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा होईल. त्यामुळे शाळा सुरू करण्याचा निर्णयही पुन्हा एकदा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. एक डिसेंबरपासून होणाऱ्या बदलांबाबत काही महत्त्वाचे निर्णय या बैठकीत होऊ शकतात.