दहा लाख लोकांनी घेतला पहिला डोस : अडीच लाख लोकांचे संपूर्ण लसीरकरण
प्रतिनिधी /पणजी
राज्यातील सुमारे 10,37,126 लोकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतल्याची नोंद आरोग्य खात्याने केली असून ती टक्केवारी 87 एवढी होत असल्याचे म्हटले आहे. सुमारे 2,70,507 जणांनी (दोन्ही) दुसरा डोस घेतल्याचे सांगण्यात आले असून काही राज्यातील वाढते कोरोना रुग्ण पाहिल्यास तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तथापि, त्यास तोंड देण्यासाठी सज्जता करण्यात आल्याची माहिती आरोग्य खात्याच्या सूत्रांनी दिली आहे.
कोरोना झालेल्या रुग्णांना 90 दिवस झाल्याशिवाय पहिला डोस घेता येत नाही. दुसऱया लाटेत सुमारे लाखभर लोक कोरोनाने बाधित झाले. त्यांनी पहिला डोस घेतला असला तरी दुसरा डोस घेण्यासाठी त्यांना 90 दिवस थांबावे लागते. या कारणामुळे अनेकांचा पहिला – दुसरा डोस देण्याचे बाकी असल्याचे सूत्रांनी नमूद केले.
कर्नाटक, महाराष्ट्र, केरळात तिसरी लाट?
महाराष्ट्र – कर्नाटक – केरळ या राज्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. ती कदाचित कोरोनाची तिसरी लाट असू शकते. त्या लाटेपासून बचाव करण्यासाठी लस घेणे, कोरोनाचे सर्व नियम पाळणे बंधनकारक आहे. म्हणून लोकांनी काळजी घेऊन सावधानता बळगण्याचे आवाहन आरोग्य खात्याने केले आहे.
गर्भवती महिलांकडून लसीकरणास अल्पप्रतिसाद
राज्यातील गर्भवती महिलांसाठी लसीकरण चालू करण्यात आले असले तरी त्यास चांगला प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून आले आहे. गेल्या 9 जुलैपासून त्यांच्याकरीता लसीकरण सुरु करण्यात आले आहे तथापि आतापर्यंत फक्त 100 गर्भवती महिलांनीच लस घेतली आहे. लसीकरणासाठी त्या महिला पुढे येत नाहीत, असे समोर आले आहे.