केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा इशारा : देशात कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्रात असल्याचा आरोप
प्रतिनिधी/सांगली
महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. दलित आणि महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. देशात सर्वाधिक केरोना रूग्ण असणाऱया दहा जिल्ह्यातील तब्बल आठ जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मिळालेल्या संधीचा उपयोग घेत वेळीच राज्य सावरावे, राज्यात राष्ट्रपदी राजवट लागू करण्याची वेळ येऊ देऊ नये असा इशाराच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना दिला.
आता आपण `गो कोरोना’ नव्हे तर `नो ‘कोरोनाचा नारा देत असून सर्वांनी सामूहिक प्रयत्नातून कोरोनाचा नायनाट करूया, कोरोनाला हद्दपार करूया असे आवाहनही मंत्री आठवले यांनी केले. राज्य सरकारची जबाबदारी आहेच. पण नागरिकांनीही सहकार्य करावे, सण समारंभाची गर्दी कमी करावी, लग्नासारख्या कार्यक्रमांना अनावश्यक गर्दीला फाटा द्यावा असे आवाहनही ना. आठवले यांनी केले.
रविवारी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगलीत आलेले ना.रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था तसेच कोरोनाची स्थिती बिघडत चालली आहे. देशात कोरोनाची सर्वाधिक गंभीर स्थिती महाराष्ट्रात आहे. मुळातच हे सरकार पाच वर्षे चालेल याची खात्री नाही. हे सरकार घालवून आमचे सरकार आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि आमचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपा नेते नारायण राणे यांनी महाराष्ट्रातील कायदा व सुव्यस्था तसेच कोरोनाची स्थिती पहाता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. त्या संदर्भाने बोलताना , `उध्दव ठाकरे यांना सुदैवाने मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली आहे. त्यांनी वेळीच सावरावे राष्ट्रपती राजवटलागू करण्याची वेळ येऊ देऊ नये’ असे ना. आठवले यांनी स्पष्ट केले.
मराठा आरक्षणासाठी पंतप्रधानाकडे मागणी
मराठा समाजासह अन्य वंचित घटकांना आरक्षण मिळालेच पाहिजे अशी आपली मागणी आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीला आपला सुरवातीपासूनच पाठींबा आहे. सर्वोच्च न्यायालयातही सकारात्मक निकाल येईल असा आपल्याला विश्वास आहे. पण आपण मराठा समाजाबरोबरच धनगर,जाट,पटेल यासारख्या बारा ते तेरा जातींनाही आरक्षण मिळावे यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली असल्याचेही ना. आठवले यांनी सांगितले.
पटोलेही आमच्यासोबत येऊ शकतात
राजकारणात काहीही होऊ शकते असे सांगून ना.आठवले म्हणाले, सध्याचे राज्यातील सरकार पाच वर्षे चालेल अशी स्थिती नाही. राजकारणात काहीही होऊ शकते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही आपल्यासोबत भविष्यात येऊ शकतील असा दावाही त्यांनी केला.