सत्यविजय नाईक यांचे आवाहन : आपमध्ये प्रवेशानंतर पहिली पत्रकार परिषद
प्रतिनिधी / पणजी
आपल्या विरोधात बोलणाऱयांवर सूड उगारण्याचे राजकारण खेळणारे वाळपईचे आमदार तथा आरोग्यमंत्री विश्वजित राणे आणि आमदार असलेले त्यांचे वडील प्रतापसिंग राणे हे दोघेही वाळपई आणि सत्तरी ही आपली वैयक्तिक मालमत्ता असल्यासारखे वागत आहेत. त्यांच्या अशा वागणुकीमुळे वाळपईमध्ये विकासाची कोणतीही कामे झालेली नाहीत, त्याशिवाय बेरोजगारांची संख्याही दिवसेदिवस वाढत आहे. त्यामुळे या जोडीची हुकुमशाही संपवायची असेल तर लोकांनी वेगळा पर्याय निवडलाच पाहिजे, असे प्रतिपादन भाजपचे माजी सचिव आणि वाळपई मतदारसंघातील भाजपचे माजी उमेदवार सत्यविजय नाईक यांनी केले आहे.
केजरीवाल विकास मॉडेल वर प्रभावित होऊन नाईक यांनी बुधवारी पक्षाचे नेते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत आम आदमी पक्षात प्रवेश केला. त्यानंतर गुरुवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी ’आप’चे गोवा उपाध्यक्ष वाल्मिकी नाईक, युथ विंगचे उपाध्यक्ष महादेव नाईक आणि शुभम शिवोलकर यांची उपस्थिती होती.
नाईक हे भाजपचे ज्ये÷ नेते होते आणि त्यांनी 2012 आणि 2017 मध्ये भाजपच्या उमेदवारीवर वाळपईतून विधानसभा निवडणूक लढवली होती. नाईक हे गोवा मीट कॉम्प्लेक्सचे माजी अध्यक्ष, ओबीसी आणि एससी महामंडळाचे माजी अध्यक्ष तसेच गोमंतक भंडारी समाजाचे कार्यकारी समिती सदस्य आहेत. उसगाव आणि अन्य पंचायत क्षेत्रात भाजप समर्थकांमध्ये लोकप्रिय असून तळागाळातील कामासाठी प्रसिद्ध आहेत. आगामी निवडणुकीपूर्वीच त्यांनी ’आप’मध्ये प्रवेश केल्याने भाजपला धक्का बसला आहे.
आपण दिल्लीत ’आप’चे काम पाहिले आहे. तसाच बदल ’आप’ गोव्यातही बदल घडवून आणेल याबद्दल विश्वास आहे. वाळपईतील तरुणांना केजरीवाल यांच्या नोकरीच्या हमीवर विश्वास आहे. गेल्या वर्षभरापासून आप तळागाळात चांगले काम करत आहे आणि हे सुरु असताना वाळपईच्या लोकांकडून सकारात्मक गोष्टी ऐकल्या आहेत, असे नाईक म्हणाले.
विश्वजित राणेंची हुकूमशाही आम्ही अनुभवत आहोत. अनुभवी नेते नाईक वाळपईमध्ये विशेषतः शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात बदल घडवून आणतील, असा मला विश्वास आहे, असे शिवोलकर म्हणाले.
आप वाळपईत अथकपणे काम करत असून ज्ये÷ आणि अनुभवी नेत्यांच्या प्रवेशाने कामाला गती मिळेल असा विश्वास महादेव नाईक यांनी व्यक्त केला. काँग्रेस आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणुनच प्रामाणिक नेते आणि गोमंतकीय ’आप’कडे जोडले जात आहेत, असे वाल्मिकी नाईक म्हणाले.