ऑनलाईन टीम / मुंबई :
देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. पूर्ण देशात जेवढी कोरोनाची संख्या वाढत आहे त्यातील 60 ते 65% ही केवळ एकट्या महाराष्ट्रातील आहे. त्यामुळे राज्यात बिकट आणि चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र सरकार हे अपयशी ठरले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून केली आहे.
दरम्यान, आज अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला याबाबत बोलताना रामदास आठवले म्हणाले की, यापूर्वीच अनिल देशमुख यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची गरज होती पण एन सी पी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना पाठीशी घालण्याचे काम केले. शरद पवार यांनी देशमुख यांना राजीनामा देण्याची परवानगी देऊन चांगले काम केले असेही ते यावेळी म्हणाले.