ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
काँग्रेस सचिव प्रियांका गाधी वाड्रा यांनी राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टवर जमीन खरेदीवरुन करण्यात आलेल्या आरोपांवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राममंदिर निर्मितीसाठी भाविकांनी आणि लोकांनी देणगी दिली आहे. या देणग्यांचा गैरवापर करणे लोकांच्या श्रद्धेचा अपमान करण्यासारखे आहे. असे प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे.
राम मंदिरासाठी खरेदी करण्यात आलेल्या जमीनीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. राम जन्मभूमी ट्रस्टच्या नावावर हा भ्रष्टाचार झाला असल्याचे समोर आले आहे. यावरुनच प्रियांका गांधी यांनी ट्विट करत लोकांच्या देणग्यांचा गैरवापर करणे हा त्यांच्या श्रद्धेचा अपमान आणि अधर्म असल्याचे म्हटले आहे.
काँग्रेस सचिव आणि उत्तर प्रदेश काँग्रेसच्या प्रभारी प्रियांका गांधी यांनी ट्विट करत करोडो लोकांच्या श्रद्धेचा अपमान ट्रस्टने केला असल्याचे म्हटले आहे. प्रियांका गांधीं यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, कोट्यावधी लोकांनी विश्वास आणि भक्तीमुळे देवाच्या चरणी देणगी अर्पण केली आहे. त्या देणगीचा गैरवापर करणे म्हणजे अधर्म आणि पाप तसेच त्यांच्या विश्वासाचा अपमान आहे.
दरम्यान, आम आदमी पक्षाचे राज्यसभा सदस्य संजय सिंह यांनी रविवारी राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टवर भ्रष्टाराचाराचे गंभीर आरोप केले आहेत. तसेच या भ्रष्टाचाराची सीबीआय आणि ईडीच्या माध्यमातून चौकशी व्हावी अशी मागणीही केली होती. राम जन्मभूमी ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी संस्थेचे सदस्य अनिल मिश्रा यांच्या मदतीने करोड रुपयांची जमीन 18 करोडमध्ये खरेदी केली असल्याचा दावा संजय सिंह यांनी केली आहे.
या आरोपानंतर अनेकांनी भाजपवर टीका केली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणी सीबीआय आणि ईडीकडून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.