भाजपचे गोमंतकीयांना आवाहन
प्रतिनिधी / पणजी
राम मंदिराचे भूमिपूजन होणाऱया दिवशी म्हणजेच दि. 5 आगॅस्ट रोजी गोमंतकीय जनतेने आपल्या घरी दिवाळी साजरी करावी, असे आवाहन भाजपने केले आहे. सायंकाळी पणत्या पेटवून तसेच दुपारी भूमिपूजनाच्या मुहुर्तावर फटाके लावून आरती करून राममंदिराचे स्वागत करावे, असेही आवाहन भाजपने केले आहे.
पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे ज्येष्ठ नेते राजेंद्र आर्लेकर व गोवा प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी सांगितले की, राममंदिर व्हावे अशी सर्वांची इच्छा आहे. त्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून अनेक आंदोलने झाली. त्यात गोव्यातूनही अनेकजण सहभागी झाले होते. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे त्यात अग्रस्थानी होते. अयोध्येतील पहिल्या कारसेवेत 100 पेक्षा अधिक कार्यकर्ते गोव्यातून गेले हेते तर दुसऱया कारसेवेत 300 पेक्षा अधिकजण सहभागी झाले होते. त्यावेळी गोव्यातील अनेक मंदिरातून रामशीला पूजनाचे कार्यक्रम करण्यात आले. राममंदिराच्या आंदोलनात भाजपाने पाठिंबा दिला आणि त्याचे समर्थनही केले. शिवाय त्यात भागही घेतला, अशी माहिती त्यांनी दिली.
राज्यात असलेल्या मंदिरांवर त्या दिवशी रोषणाई करण्यात यावी तसेच रामभक्तांनी दुपारी भूमिपूजनांच्या मुहुर्तावर घंटानाद करावा, असे आवाहनही त्यांनी गोमंतकीय जनतेला केले आहे. राममंदिर हे राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक असून ते खऱया अर्थाने राष्ट्रमंदिर असल्याचे त्यांनी नमूद केले. राममंदिरच्या स्वागताचे अनेक बॅनर्स लावण्यात येणार असून त्यावर भाजपाचा झेंडा किंवा चिन्ह नसणार असे त्यांनी सांगितले.
राजभवनाचे पंचतारांकीत हॉटेल करण्यात येणार असल्याचा काँग्रेस प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर यांचा आरोप <श्री. तानावडे यांनी फेटाळून लावला आणि त्यांनी पुरावे सादर करावेत, असे आव्हान दिले. चोडणकर हे कंत्राटी अध्यक्ष असल्याचा टीकाही त्यांनी केली.