विजयादशमी हा दिवस श्रीरामांनी रावणाचा वध केला म्हणून साजरा केला जातो. त्याची आठवण म्हणून या दिवशी प्रतिकात्मक रूपाने रावणाच्या प्रतिमेचे दहन केले जाते. दुर्दैवाने या उत्सवामागचा मूळ उद्देशच आपण विसरून गेलो आहोत. त्यामुळे या पवित्र दिवसाला एक सामाजिक मनोरंजन या पलीकडे काही महत्त्व दिले जात नाही. विजयादशमीचा दिवस हा फक्त रावणाच्या प्रतिमेला जाळण्यापुरता मर्यादित नाही तर आपल्या हृदयातील ‘रावणाचे’ दहन करण्यासाठीही आहे हे आपण समजून घेत नाही. आपल्या शरीरामध्ये षड्रिपूच्या रूपाने काम, क्रोध, मद, लोभ, मोह आणि मत्सर हे सहा अनर्थ वास्तव्य करतात. या षड्रिपूमुळे माणसाचे राक्षसात परिवर्तन होते. श्रीमद भागवतमध्ये वर्णन केलेल्या ऐतिहासिक घटनेप्रमाणे वैकुंठाचे द्वारपाल जय आणि विजय याना चतुषकुमार यांच्या शापामुळे तीन जन्म राक्षस म्हणून जन्म घ्यावे लागले. त्यामुळे ते सत्ययुगामध्ये हिरण्याक्ष (लोभ) आणि हिरण्यकश्यपू (मद अथवा गर्व), त्रेतायुगामध्ये रावण (काम) आणि कुंभकर्ण (मोह अथवा भ्रम) व द्वापारयुगामध्ये शिशुपाल (मत्सर) आणि दंतवक्र (क्रोध) या रूपाने जन्माला आले. अशापैकी एक ऐतिहासिक व्यक्ती रावण हा जरी पुलस्य ऋषींचा पुत्र विश्रवा या ब्राह्मणाचा पुत्र म्हणून जन्माला आला. तो वेदशास्त्रामध्ये निपुण होता, शंकराचा निस्सीम भक्त होता, सुवर्ण लंकेचा ऐश्वर्यवान राजा होता तरीपण प्रभू रामचंद्रांची पत्नी सीतेचे अपहरण करण्याचे दु:साहस त्याने केले म्हणून श्रीरामाने त्याचा वध केला. हे धर्मविरुद्ध कृत्य करण्यास रावणाचा ‘काम’ कारणीभूत होता. ‘काम’ ह्याचा अर्थ आहे अनियंत्रित इंद्रिय भोग करण्याची इच्छा. रावणाला मंदोदरीसारखी सुंदर सर्वगुणसंपन्न पतिव्रता स्त्री पत्नी म्हणून लाभली होती. तरीही सीतेच्या सौंदर्याचे वर्णन शूर्पणखेद्वारा ऐकून रावणाचा ‘काम’ जागृत झाला म्हणून त्याने सीतेला फसवून अपहरण करून श्रीलंकेला आणले आणि हेच ‘काम’ कृत्य त्याच्या सर्वनाशाला कारणीभूत ठरले.
कलियुगामध्ये वर वर्णन केलेले सहाही राक्षस षड्रिपुच्या रूपाने आपल्या प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहेत. त्याचा नाश करणे म्हणजे आपल्या हृदयातील ‘रावण’ नष्ट करणे होय. आपणही जेव्हा भगवंताचे अस्तित्व नाकारून अथवा विसरून ज्यावेळी त्यांनी निर्माण केलेल्या निसर्गाचा अनियंत्रित, नियमाविरुद्ध भोग घेण्याची इच्छा करतो तेव्हा आपल्या हृदयातील ‘रावण’ जागा होतो. अशा लोकांचा समाज हा सर्वनाशाला कारणीभूत ठरतो. आज समाजामध्ये धार्मिक मूल्यांच्या शिक्षणाच्या अभावाने इंद्रियलोलुपता वाढत चालली आहे. त्यासाठी निरनिराळी साधनेही उपलब्ध करून दिली जात आहेत. विशेषतः तरुण तरुणींसमोर पवित्र धार्मिक मूल्यांऐवजी ‘प्रेमा’च्या नावाखाली ‘कामवासना’ भडकवणारी दृष्ये दाखवली जातात आणि तोच त्यांचा आदर्श बनतो. आणि मग चित्रपट, दूरचित्रवाणी मालिकांप्रमाणे आपले जीवन जगण्याचा अट्टाहास करून मिळेल त्या मार्गाने धन कमावून दिशाहीन व्यर्थ जीवन जगण्यातच असे लोक धन्यता मानतात. अशा अमर्याद इंद्रियतृप्तीतच आपले आयुष्य वाया घालवून मनुष्य जीवनाचा मूळ उद्देश भगवत्प्राप्ती हा आहे हे विसरून जातात आणि मग पैसे कमावणे आणि त्याचा अमर्यादित उपभोग घेणे ही ‘रावण’ वृत्ती निर्माण होते. अशा भरकटलेल्या लोकांसाठी रावणाची संपत्ती किती होती व शेवटी त्याचे काय झाले याचे वर्णन करताना तुकाराम महाराज म्हणतात,
लंकेमाजी घरे किती ती ऐका ।
सांगतसे संख्या जैसी तैसी ।।1।।
पाच लक्ष घरे पाषाणांची जेथे ।
सात लक्ष तेथे विटबंदी ।।2 ।।
कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची ।
शुद्ध कांचनाची सप्तकोटी ।। 3 ।।
तुका म्हणे ज्याची संपदा एवढी ।
सांगातें कवडी गेली नाही ।। 4 ।।
तुकाराम महाराज म्हणतात, रावण जेथे राज्य करीत होता तेथील घरांची संख्या किती होती ती सांगतो ऐका. तेथे चिरेबंदी घरे पाच लाख व विटांनी बांधलेली घरे सात लाख होती. कांस्य धातूची एक कोटी, तांब्याची एक कोटी आणि सोन्या चांदीची सात कोटी घरे होती. ज्याची अशी अमर्याद संपत्ती होती, त्याच्याबरोबर शेवटी एक कवडीही गेली नाही.’ हा क्षणभंगुरतेचा महत्त्वाचा संदेश जेव्हा माणूस विसरतो तेव्हा राक्षस व्हायला वेळ लागत नाही. आपल्या हृदयामध्ये दैवी आणि आसुरी गुण दोन्ही बीज प्रमाणात आहेत. ज्या गुणांना आपण उत्तेजन देतो त्याप्रमाणे त्यांचा प्रभाव आपल्या जीवनावर होत असतो. दैवी गुण म्हणजे भगवंतावर प्रेम करणे, त्यांच्या आज्ञांचे पालन करून त्यांच्या आश्रयाखाली राहून पवित्र जीवन जगणे होय. आसुरी गुण म्हणजे भगवंताच्या अस्तित्वाला आव्हान देणे, त्यांच्या भगवद्गीतेमध्ये दिलेल्या आदेशांना झुगारून स्वैर पापी जीवन जगणे होय. अशी आसुरी जीवनशैली असणारे त्रेतायुगामध्ये रावणासारखे असुर क्वचितच होते पण कलियुगामध्ये अशा ‘रावणां’चे प्रमाण अमर्यादित आहे. कमीत कमी आपल्या हृदयात हा ‘रावण’ तरी दडलेला नाही ना, याचा शोध आपण घेऊ शकतो. कारण ‘राम’ आहे तेथे ‘रावण’ राहू शकत नाही आणि ‘रावण’ आहे तेथे ‘राम’ राहू शकत नाही. अशा ‘काम’रुपी रावणाचे ‘नाम’रुपी श्रीरामांच्या साहाय्याने दहन केले पाहिजे हाच या विजयादशमीचा संदेश आहे. इतर युगामध्ये रावणासारखे बलवान राक्षस समाजामध्ये क्वचितच अस्तित्वात होते. सर्व समाज भगवत्भक्तीचे पालन करीत असे म्हणून समाज शांत, अंतर्बाह्य स्वच्छ, दयाळू, त्यागी, तपस्वी, आनंदी असा सर्वगुणसंपन्न होता. पण दुर्दैवाने कलियुगामध्ये समाजामध्ये ‘रावण’ प्रवृत्तीचा म्हणजे भगवंताच्या प्रकृतीचा अमर्याद भोग घेणाऱयांची संख्या अगणित आहे म्हणूनच श्रीमद भागवतमध्ये या कलियुगाला दोषांचा सागर म्हटले आहे. पण याच कलियुगामध्येदेखील सुदैवाने एकच चांगला गुण आहे तो म्हणजे भगवन्नामाचा जप करणे. जो श्रद्धेने हरिनामाचा जप करतो त्यांच्या हृदयातील रावणाचे आपोआप दहन होते. म्हणूनच तुकाराम महाराज सांगतात,
रामनामाचे पवाडे । अखंड ज्यांची वाचा पढे ।। 1 ।।
धन्य तो एक संसारी । रामनाम जो उच्चारी ।।2।।
रामनाम गरजे वाचा । काळ आज्ञाधारक त्याचा ।। 3 ।।तुका म्हणे रामनामी ।
कृतकृत्य झालो आम्ही ।।4।।
तुकाराम महाराज म्हणतात ‘ज्यांची वाचा अखंड रामनामाची कीर्ती गाते, जो नित्य रामनामाचा उच्चार करीत असतो, जो रामनामाची गर्जना करतो तो या संसारात धन्य होय, त्याची आज्ञा काळदेखील पाळतो. म्हणून आम्ही रामनामाचा आश्रय घेऊन कृतकृत्य झालो आहोत’. तर सांगायचे तात्पर्य एवढेच की केवळ रावणाची प्रतिमा दहन केल्याने तो आपल्या हृदयातून मरणार नाही तर ‘रामबाण’ म्हणजे कधीही वाया न जाणारा बाण, ज्याने रावणाचे हृदय छेदले ते रामनामच आपल्या हृदयातील कामरूपी रावण जाळून टाकेल. तेव्हाच हा विजयादशमीचा उत्सव साजरा केल्याचे सार्थक होईल.
वृंदावनदास