प्रतिनिधी /मडगाव
भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचे असल्यास सर्व समविचारी पक्षांनी युती केली पाहिजे असे मत काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जुझे फिलीप यांनी काल बुधवारी वेर्णा येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काढले. यावेळी पक्षाचे आमदार चर्चिल आलेमाव तसेच पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अविनाश इत्यादी उपस्थितीत होते.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तयारी सुरू केली असून सर्व मतदारसंघात गट समित्या स्थापन केल्या जाणार असल्याची माहिती यावेळी जुझे फिलीप यांनी दिली. जर समविचारी पक्षाची युती झाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ‘एकला चलो रे’ पद्धतीने निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अनेक नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात
दरम्यान, अनेक नेते सद्या राष्ट्रवादीच्या संपर्कात असून आगामी काळात ते पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. हे नेते कोण असणार यावर मात्र त्यांनी भाष्य केलेले नाही. काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले काही आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्या संदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मौन पाळणे पसंत केले.
समविचारी पक्षाची युती झाली नाही तर नक्कीच त्यात काही तरी संशयास्पद असले असे गृहित धरले जाणार असल्याचे जुझे फिलीप म्हणाले. समविचारी पक्षांनी युती करून जनतेला सुद्धा चांगला संदेश द्यायला पाहिजे असे ते म्हणाले.
नुवे मतदारसंघ आपल्या आवडीचा
यावेळी बोलताना आमदार चर्चिल आलेमाव म्हणाले की, नुवे मतदारसंघातून यापूर्वी आपण कठीण काळात सुद्धा ऍड. राधाराव ग्रासियश यांना निवडणुकीत उभे करून त्यांना आमदार बनविले होते. या मतदारसंघात आपले असंख्य चाहते असून हा मतदारसंघ आपल्या आवडीचा असल्याचे सांगितले.
कोणत्याही पक्षाचा प्रदेश अध्यक्ष हा योग्य माणूस असला पाहिजे तरच सर्व गोष्टी व्यवस्थित होतात असे त्यांनी काँग्रेसचा उल्लेख न करता काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्यावर निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी युती आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
अविनाश यांची काँग्रेस पक्षावर टीका
गेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे 17 आमदार निवडून आले होते. त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली व भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेसकडे केवळ 5 आमदारच शिल्लक राहिले. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकमेव आमदार होता, तो आमदार शेवट पर्यंत पक्षाशी प्रामाणिक राहिला. त्यामुळे काँग्रेसने इतरांवर हुकूमत गाजवू नये असे असे अविनाश म्हणाले.
काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नुवे मतदारसंघातील गटाची निवड केली. नुवे गटाच्या अध्यक्षपदी प्रेंकी डिमेलो यांची निवड करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. त्याचे जुझे फिलीप व चर्चिल आलेमाव यांनी स्वागत केले.