प्रतिनिधी / सातारा :
मध्यप्रदेश येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील खेळाडूंनी 18 सुवर्ण पदकांची कामगिरी करत सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. एकूण 18 सुवर्ण, 3 रौप्य, व 3 कांस्य पदके मिळवून मोलाची कामगिरी स्पर्धकांनी केली. या स्पर्धेमध्ये 22 राज्यातील स्पर्धक सहभागी झाले होते.
26 ते 30 सप्टेंबर 2021 रोजी माधव सेवा न्यास, उज्जैन, मध्यप्रदेश येथे राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धा झाल्या. या स्पर्धेमध्ये सातारा जिल्ह्याच्या खेळाडूंनी सर्वाधिक पदके मिळवून दैदिप्यमान कामगिरी केली. या स्पर्धेत जिल्ह्यातील 11 खेळाडूंचा समावेश होता. 12 वर्षाखालील मुले/मुली वयोगटामध्ये वैष्णवी पवार (4 सुवर्ण पदके), आयुष शिंदे (3 सुवर्ण व 1 रौप्य पदके), आयुष काळंगे (2 सुवर्ण व 1 कांस्य पदक), अथर्व भिसे (सुवर्ण पदक). 14 वर्षाखालील मुले/मुली वयोगटामध्ये भार्गवी गोसावी ( सुवर्ण पदक), ओम पाटील (कांस्य पदक), वेदांत कदम ( कांस्य पदक) पटकावले आहे.
तर 16 वर्षाखालील मुले/मुली प्रणाली मोरे (3 सुवर्ण व 1 रौप्य पदक), भक्ती मोरे (2 सुवर्ण व 1 रौप्य), 16 वर्षावरील मुली वयोगटामध्ये पल्लवी शिंदे ( सुवर्ण पदक), चैताली जगताप (1 सुवर्ण पदक) अशी एकूण 18 सुवर्ण, 3 रौप्य, व 3 कांस्य पदके मिळवून मोलाची कामगिरी या स्पर्धकांनी केली.