अध्याय बारावा
भगवंतांच्या सहवासात गोपिका कशा गुंग होऊन जात ते भगवंत उद्धवाला वर्णन करून सांगत होते. ते म्हणाले, त्यांची संपूर्ण दिनचर्या माझ्या हालचालींवर बेतलेली होती. मला वृंदावनात जाताना पाहताच माझे मुख पाहून त्या प्रातःकाळी आनंदी होत. दोन प्रहरच्या वेळी मी गाईंना पाणी पाजून आणत असे, तेथे मला पाहण्यासाठी त्या गौळणी पाण्याच्या निमित्ताने येत असत. तेथे नानाप्रकारचे विनोद, अनेक प्रकारच्या लीला व अनेक प्रकारचे खेळ खेळताना मौज वाटून त्या प्रेमळ गोपिका आनंदाने सुखी होत असत.
मला सायंकाळी गावात येताना पाहून आरत्या व निंबलोण घेऊन त्या माझ्यासमोर धावत येत आणि मोठय़ा आनंदाने चरणांवर मस्तक ठेवीत. अशा रीतीने सकाळी, दुपारी व संध्याकाळी अशी तिन्ही काळी माझी दर्शने घेऊनही त्यांच्या चित्ताची तृप्तता होत नसे. त्याच्याही पलीकडची एक अत्यंत गुह्य व एकांतात घडलेली गोष्ट आहे. उद्धवा ! त्या गुह्य गोष्टीतील महत्त्व मी तुला सांगेन. ते महान् सुखाचेही सुखस्थान आहे. मी प्रत्यक्ष श्रीकृष्ण असतानाही, त्या सुखात नाचत राहिलो.
रासक्रीडेच्या रात्री आम्हा सर्वांना जी सुखप्राप्ती झाली, ते सुख गोपिकाच जाणतात किंवा मीच जाणतो. त्या सुखातील सुखगोडी, बिचारी लक्ष्मी तरी काय जाणणार ? ब्रह्मदेवादिकसुद्धा केवळ वेडे होऊन गेले. तरी ते त्या सुखाची गोडी जाणू शकले नाहीत. ते सुख मिळविण्याकरिता शंकर योगाभ्यासी झाले, तरीही त्याना त्या सुखाची प्राप्ती झाली नाही. ते मोहिनीला पाहताच भुलून गेले. पार्वतीने भिल्लीण होऊन शंकराना भुलवले. त्या सुखाची गोष्ट हटयोगी व तपस्वी लोक जाणत नाहीत. उद्ध्वा ! महामूर्ति संकर्षण हा खरोखर जवळ असूनही त्याला त्या सुखाची प्राप्ती मुळीच झाली नाही. गोपिकांजवळ ही जी रासक्रीडा झाली, त्यावर कोणी असे म्हणेल की, ती केवळ कामासक्ती होती. पण तेथे कामाची प्राप्ती कोठली ? उद्धवा ! नीट ऐकून घे. कामाने शंकराला पूर्णपणे जिंकल्यामुळे तो काम म्हणू लागला की, “मी मोठा पराक्रमी आहे !’’ तो आपले धनुष्यबाण सज्ज करून माझ्या रासक्रीडेचा भेद करण्यासाठी निघाला. परंतु जेथे माझ्या स्वरूपाची ढाल संरक्षणासाठी असेल, तेथे कामाचा कामपणा चालत नाही. मदनाच्या बाणांचे अगदी तुकडे तुकडे उडून गेले, इतकी माझ्या स्मरणाची ढाल बळकट आहे. मदनाची दृष्टि मोठी चपल असते. तो पराक्रमी मदन संधी साधून कामुकांना आपल्या तीक्ष्ण बाणाने विद्ध करतो पण ती कामबाणवृष्टि श्रीहरीच्यापुढे मुळीच टिकाव धरीत नाही. ज्या ठिकाणी मी प्रत्यक्ष आत्मारामच क्रीडा करीत असतो, तेथे बिचारा काम घुसणार कसा ? माझ्या प्राप्तीच्या इच्छेनेच गोपिका कामरहित झाल्या. त्यांना कामवासना उरली नाही. जो जो कोणी माझ्या नामाचे स्मरण करतो, त्याच्याकडे काम पाहूच शकत नाही. ज्या ठिकाणी मी पुण्योत्तम रममाण होतो. त्या ठिकाणी कामकर्माचा रिघाव होत नाही. काम म्हणतो, “हाय हाय ! मी भाग्याला चढूनही मोठा अभागी झालो ! रासक्रीडेतील शेवटच्या गोष्टीपर्यंत आज मी करंटा पोहचूच शकत नाही ! ती मौजेची रासक्रीडा पाहून काम घटाघटा लाळ घोटीत बसला, तरी त्याला त्यातील लेशही प्राप्त झाला नाही. म्हणून ते सुख मिळण्यासाठी अभिमानाची लाज सोडून देऊन तो माझ्याच पोटी जन्मास
आला.
त्या मदनाला मी आपल्या मांडीवर घेतले व लाडिकपणाने त्याला आनंदित केले. असे ते माझे आत्मसुख गोपींनी रासक्रीडेच्या निमित्ताने भोगले. ती रासक्रीडेची रात्र मी ब्रह्मदेवाच्या सहा महिन्यांएवढी केली होती. पण गोपिकाना ती रात्र अर्ध्या क्षणासारखी वाटून सकाळी “इतक्मया लौकर सूर्य का उगवला ?’’ असे त्या विचारू लागल्या. जेथे माझ्याच क्रीडासुखाच्या लाटा उसळत होत्या, तेथे काळ आणि वेळ कोण स्मरणार ? गोपींचे भाग्य मोठे बलवत्तर, म्हणूनच माझे शुद्ध सुख त्यांना मिळाले. माझ्या संगतीत त्यांनी अशा किती रात्री उपभोगिल्या त्याची गणतीच नाही. तरी त्यांची तृप्ती म्हणून झाली नाही. माझ्यावर त्यांचे प्रेम वाढतच गेले.