‘लोकशाही’वरून वक्तव्य : भाजपनेही कठोर शब्दात सुनावले
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘भारत हा आता लोकशाहीप्रधान देश राहिला नाही’ असे ट्विट करत त्यांनी एक फोटोही शेअर केला आहे. स्विडनमधील एका संस्थेच्या अहवालाचा आधार घेत त्यांनी हे ट्विट केले आहे. मात्र, भाजपनेही त्यांना कठोर शब्दात सुनावले आहे.
राहुल गांधी यांनी भारतीय लोकशाहीविषयी भाष्य करताना ‘विदेशी’ दाखले देण्याचा प्रयत्न केला आहे. स्वीडनमधील एका इन्स्टिटय़ूटच्या डेमोक्रसी रिपोर्टचा हवाला त्यांनी दिला आहे. त्यांनी शेअर केलेल्या फोटोवर ‘पाकिस्तानप्रमाणे भारतही निरंकुश आहे. बांगलादेशपेक्षाही भारताची परिस्थिती बिकट आहे.’ असा मजकूर नमूद आहे. यापूर्वी राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनाला 100 दिवस पूर्ण झाल्यावरही केंद्र सरकारला ट्विटरच्या माध्यमातून लक्ष्य केले होते.
भाजपचा पलटवार
भाजप नेते राकेश सिन्हा यांनी राहुल गांधी यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पाश्चिमात्य देशातील नवसाम्राज्यवादी शक्तींना भारताची वाढती ताकद, प्रति÷ा आणि विश्वसनियता सहन होत नाही. त्यांच्यासाठी भारतातील एका एजंटच्या रुपात राहुल गांधी काम करत आहेत. आता स्विडनच्या एका संस्थेने जारी केलेला अहवाल राहुल गांधी पुढे करत आहेत. राहुल गांधी पाश्चिमात्य देशांच्या शक्तींसोबत मिळून भारताच्या सार्वभौमत्वाची अवहेलना असल्याची टीका भाजपने केली आहे.