येळ्ळूर,सुळगा शेतकऱ्यांना पुन्हा मांडावे लागणार म्हणणे
► प्रतिनिधी / बेळगाव
रिंगरोडविरोधात शेतकऱ्यांनी तक्रारी दिल्या आहेत. येळ्ळूर, सुळगा, यरमाळ या गावच्या शेतकऱ्यांनी यापूर्वी तक्रारी देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे पुन्हा त्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. दि. 6 जून रोजी येळ्ळूरच्या शेतकऱ्यांना पुन्हा म्हणणे मांडावे लागणार आहे.
रिंगरोडमध्ये तालुक्यातील 32 गावांच्या जमिनी जात आहेत. सर्व जमिनी या सुपिक आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्याला तीव्र विरोध केला आहे. 32 गावांतील शेतकऱ्यांनी विरोध केला असतानाही अचानकपणे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कर्मचारी सर्व्हे करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत जमीन देणार नाही, असे स्पष्ट म्हणणे मांडले आहे. तरीदेखील पुन्हा पुन्हा शेतकऱ्यांना नोटिसा पाठविणे, सर्व्हे करणे असे प्रकार सुरू झाल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
येळ्ळूरच्या शेतकऱ्यांना पुन्हा म्हणणे मांडावे लागणार आहे. शिवबसवनगर येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात उपस्थित राहून हे म्हणणे मांडावे लागणार आहे. येळ्ळूर परिसरातील ज्या शेतकऱ्यांना नोटिसा आल्या आहेत, त्यांनी त्यादिवशी उपस्थित राहून आपले म्हणणे मांडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.