रेल्वेसेवेला अद्याप प्रवाशांचा अल्पप्रतिसाद
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावानंतर लॉकडाऊनच्या काळात प्रवासी रेल्वेसेवा बंद करण्यात आली होती. मे 20 पासून बेळगावमधून रेल्वेसेवा सुरू करण्यात आली. परंतु या रेल्वेसेवेला अद्याप प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे रेल्वेला आता प्रवाशांची प्रतीक्षा करण्याची वेळ येत आहे.
लॉकडाऊनपूर्वी रेल्वे तिकिटांसाठी वेटिंगवर राहावे लागत होते. बेळगाव रेल्वेस्थानकातून देशातील अनेक शहरांना रेल्वेसेवा असल्यामुळे नेहमीच प्रवाशांचा ओढा बेळगावला असतो. बेळगावला विमानतळ तसेच इतर वाहनांच्या सुविधा असल्यामुळे प्रवासी येथून रेल्वेला बुकिंग करत असतात. येथून निजामुद्दीन, राजस्थान, मुंबई, पुणे, बेंगळूर, हैदराबाद, तिरुपती, एर्नाकुलम, पुद्दुचेरी या ठिकाणी रेल्वे जातात.
लॉकडाऊनमुळे रेल्वेची प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली. लॉकडाऊनची नियमावली काहीशी शिथिल झाल्यानंतर बेळगाव-बेंगळूर ही रेल्वेसेवा सुरू करण्यात आले. परंतु त्याला तितकासा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर हीच रेल्वे रात्रीच्या वेळी सुरू करण्यात आली. तरीही 300 च्या वर प्रवाशांची संख्या गेली नाही. गोवा एक्स्प्रेसला काही प्रमाणात प्रवाशांची संख्या आहे. परंतु तिही एकूण आसनसंख्येच्या किती तरी कमी आहे. यामुळे रिकाम्या रेल्वे फिरविण्याची वेळ रेल्वे विभागावर आली आहे.
बेंगळूरच्या लॉकडाऊनचा झाला परिणाम
बेंगळूर येथे वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु याचा परिणाम रेल्वेच्या वाहतूक सेवेवर होत आहे. बेळगावमधून रिकामी रेल्वे बेंगळूरच्या दिशेने जात आहे. बेंगळूर येथे गेल्यानंतरही प्रवाशांना इतर व्यवस्था मिळत नसल्याने प्रवासी प्रवास टाळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.