चिपळूण
लोटे येथे होत असलेल्या रेल्वे प्रकल्पामध्ये कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घ्यावे, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा रोजगार आघाडीचे मुंबई अध्यक्ष अमित तांबे यांनी दिला आहे.
कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांनी अनेकदा मागणी करूनही नोकरीत सामावून घेतलेले नसून निव्वळ आश्वासनापलिकडे त्यांच्या पदरी काहीच पडलेले नाही. या पार्श्वभूमीवर शनिवारी चिपळुणात प्रकल्पग्रस्तांसह रिपब्लिकन (आठवले) रोजगार आघाडीच्या पार पडलेल्या बैठकीत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, रेल्वे प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी गेल्या 4 मार्च रोजी बेलापूरच्या कोकण रेल्वे मुख्य कार्यालयातील मुख्य कार्यकारी अधिकारी के. के. ठाकूर यांच्यासमवेत कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती समिती, रोजगार आघाडी व कोकण जनता विकास परिषद यांच्या संयुक्त पार पडलेल्या बैठकीत छाननीतून डावललेल्या प्रकल्पग्रस्तांचा विचार करु, असे आश्वासन मुख्य व्यवस्थापकीय संचालकांनी दिले होते. मात्र त्यानंतर अधिकाऱयांनी या विषयाकडे डोळेझाक केली आहे. आता या प्रश्नी रोजगार आघाडीने केंद्रिय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पुढाकार घेतला आहे. या माध्यमातून कोकणातील अन्यायकारक रेल्वे प्रकल्पग्रस्ताना एकत्रित केले जात असून त्यांना न्याय मिळावा, या दृष्टीने त्याचे नवे संघटन उभे केले जात आहे. रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या नोकर भरती प्रक्रियेचे धोरण निश्चित करण्यासाठी रेल्वेमंत्री पियुष गोयल व केंद्रिय मंत्री आठवले यांची संयुक्त बैठक घेऊन त्यात कोकणातील रेल्वे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न उपस्थित केले जाणार आहेत. यातूनच प्रकल्पग्रस्तांची पुढील दिशा ठरवली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याचवेळी कोकण जनता विकास परिषदेच्या तालुका संघटकपदी हमीद सय्यद यांची निवड करण्यात आली. यावेळी प्रशांत मोहिते, उमेश सकपाळ, निखिल शिवलकर, चंद्रकांत काळे, नितीन मोहिते, कुणाल जाधव, सनी मयेकर, मनोहर तांबिटकर आदी उपस्थित होते.