राजधानी दिल्लीचे मुख्य रेल्वे स्थानक जगातील आदर्श स्थानक बनविण्याची योजना आहे. अत्याधुनिक सोयींनी युक्त अशी इमारत हे वैशिष्टय़ राहणार आहे. दृष्टीक्षेप केला असता ही रेल्वे स्थानकाची इमारत वाटणारच नाही. योजनेचे प्रारूप सज्ज असून ती सात वर्षांच्या कालावधीत आकाराला येईल. या स्थानकाच्या परिसरात आल्यानंतर आपल्याला अत्यंत प्रगत अशा कोणत्यातरी देशात आल्यासारखे वाटेल, असे या इमारतीचे बांधकाम असेल.
केवळ दिल्लीचेच नव्हे, तर 62 शहरांमधील रेल्वेस्थानके येत्या 10 वर्षांमध्ये अशाप्रकारे आपले रंगरूप पालटणार आहेत. ही योजना रेल्वे भूमी विकास प्राधीकरणाकडून साकारली जात आहे. रेल्वे विभागाकडे मोठय़ा प्रमाणात भूमी विनाउपयोग पडून आहे. याच भूमीचा उपयोग अनेक रेल्वे स्थानकांचा विस्तार आणि विकास यासाठी केला जाणार आहे. योजनेसाठी प्राथमिक व्यय 5 हजार कोटी रूपयांचा असेल. आवश्यकतेनुसार त्यात भर टाकली जाईल. या वास्तूरचनांच्या माध्यमातून 50 हजार नवे रोजगार निर्मिले जातील, असे सांगण्यात येत आहे. रेल्वे स्थानकांजवळच आधुनिक आरामगृहे, हॉटेले, वस्तीगृहे आणि मनोरंजन केंद्रे बनविण्याचीही योजना आहे. एकंदर, प्रवाशांना आरामदायक अनुभवय यावा असा सारा थाटमाट असेल अशी माहिती देण्यात आली.