सीआयडीची रात्रीपासून पहाटेपर्यंत छापेमारी : सरकारी गोदामांतून धान्य जाते खासगी गोदामांत,गोव्यातून चोरलेले धान्य जातेय कर्नाटकात
प्रतिनिधी /पणजी
राज्यात रेशन कार्डवर स्वस्त दरात वितरीत करण्यासाठी येणाऱया गहू व तांदळांचा काळा बाजार करणाऱया रॅकेटचा गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी सोमवारी रात्रीपासून मंगळवारी पहाटेपर्यंत पर्दाफाश केला. नागझर-कुर्टी, कुंडई औद्योगिक वसाहत व आजोर्डा बोरी या तीन ठिकाणी छापे मारून 751 तांदळांच्या व 283 गव्हांच्या गोण्या जप्त करण्यात आल्या आहेत. पाच संशयितांना अटक केली असून, दोघे संशयित फरार झाले आहेत. तीन वाहनेही जप्त करण्यात आली आहेत. संशयितांच्या विरोधात भादंसंच्या 380 तसेच 12बी कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अटक केलेल्या संशयितांमध्ये तौसिफ मुल्ला (30, फोंडा दुर्गाभाट), राम कुमार, हजरत अली सय्यद, विनय कुमार गुड्डामणी व प्रकाश कोरीशट्टर (55) यांचा समावेश आहे. फरार झालेल्या संशयितांमध्ये सचिन नाईक व विरेंद्र म्हर्दोळकर यांचा समावेश आहे.
प्रकाश कोरीशट्टर हा हुबळी येथील असून गोव्यातून बेकायदेशीररीत्या जाणारा तांदूळ व गहू तो विकत घेत होता. त्याला सोमवारी पहाटे हुबळी येथे अटक करून गोव्यात आणले आहे. अटक पेलेल्या संशयितांना आज बुधवारी रिमांडसाठी न्यायालयात हजर केले जाईल.
सरकारी गोदामांमध्ये बेहिशोबी धान्यसाठा
सांगे, बेतोडा व पणजी येथील सरकारी गोदामांवरही छापे मारून बेहिशोबी तांदूळ, गहू जप्त करण्यात आला आहे. सरकारी गोदामात बेहिशोबी गहू, तांदळांचा साठा केला जातो. नंतर या साठय़ाचा काळा बाजार करून चोर मार्गाने कर्नाटकात विकला जातो. नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱयांना हाताशी धरून संशयित सचिन नाईक सरकारी गोदामातील तांदूळ व गहू आपल्या गोदामात घेऊन जायचा. गोण्यांवर सरकारी छाप असल्याने त्या गोण्या बदलून प्रकाश कोरीशट्टर याला विकायचा. गेल्या कित्येक वर्षापासून हा काळा बाजार सुरु होता.
चोरीच्या तांदळांचा कर्नाटकात बनतो डोसा
ज्या गोण्या रिकाम्या केल्या जायच्या त्या रिकाम्या गोण्यांनाही कर्नाटकात बऱयापैकी मागणी असून त्याही विकल्या जात होत्या. काळा बाजार करून कर्नाटकात विकलेला तांदूळ डोसा करण्यासाठी वापरला जात असल्याने तेथे तांदळांना मोठय़ाप्रमाणात मागणी आहे.
धान्य बेळगावला नेण्याच्या तयारीत असतानाच छापा
नागझर-कुर्टी फोंडा येथे केलेल्या कारवाईत 304 तांदूळ व 170 गव्हाच्या गोण्या जप्त करण्यात आल्या आहेत. बेळगांव येथे नेण्याच्या तयारीत असताना सीआयडीने छापा मारून तांदूळ व गहू जप्त करण्यात यश मिळविले. प्रकाश कोरीशट्टर तसेच विनयकुमार गुड्डमणी व हजरत अली सय्यद यांना अटक करण्यात आली. सचिन नाईक हा घटनास्थळी होता, मात्र पोलीस येत असल्याचे पाहून त्यांने घटनास्थळावरून पलायन केले.
कुंडई औद्योगिक वसाहत येथील गोदामावर छापा मारून तांदळाच्या 330 व गव्हाच्या 40 गोण्या जप्त करण्यात आल्या आहेत. आजेर्डा बोरी येथील दुकानात केलेल्या कारवाईत 226 तांदळाच्या तर 43 गव्हांच्या गोण्या जप्त करण्यात आल्या. या ठिकाणी तौसिफ मुल्ला याला अटक करण्यात आली असून विरेंद्र म्हार्दोळकर हा पसार झाला आहे.
संशयित सचिन नाईक हा काळा बाजार करण्याच्या प्रकरणातील सराईत गुन्हेगार आहे. आजोर्डा बोरी येथे त्याचे दुकान आहे. 2012 सालातही त्याच्या विरोधात या प्रकाराबाबत तक्रार नोंद झाली होती. त्या प्रकरणातून सुटल्यानंतर त्यांनी पुन्हा तोच बेकायदेशीर धंदा सुरु केला होता.
गुन्हा अन्वेषण विभागाचे उपधीक्षक सुरज हळर्णकर यांच्या मार्गदर्शनाखाली टॅरेन्ट डिकॉस्ता, लक्षी आमोणकर, योगेश सावंत, नेताल आल्मेदा, विश्वजित चोडणकर, यांनी ही कारवाई केली आहे.
तांदूळ-गहू प्रकरणाची सखोल चौकशी करणार : मुख्यमंत्री
नागरी पुरवठा खात्यातील अतिरिक्त तांदूळ व गहू यावर डल्ला मारणाऱयांची गय केली जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मडगावात प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. आपण हा विषय गांभीर्याने घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
कोरोना महामारीच्या काळात तूरडाळ व साखर नागरी पुरवठा खात्याच्या गोदामात खराब झाली होती. हे प्रकरण गोव्यात बरेच गाजले होते. त्यानंतर काल मंगळवारी तांदूळ व गहू प्रकरण उघडकीस आले आहे. यामुळे नागरी पुरवठा खात्याची बदनामी झाली. या प्रकरणात ज्या व्यक्ती गुंतलेल्या असतील त्यांची चौकशी होईलच. त्याच बरोबर कठोर कारवाई केली जाईल असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले. नागरी पुरवठा खात्यातून मालाची उचल होत नाही. त्यामुळे माल पडून राहतो आणि त्यानंतर अशा भानगडी घडत असतात. जो नागरिकांसाठी कोटा आहे, तो नागरिकांपर्यंत पोचला पाहिजे. हे सरकारचे काम असून त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.