काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचे जनतेला आवाहन, मोरपिर्ला येथे आदिवासी महिलांशी साधला संवाद
वार्ताहर /केपे
काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यास 30 टक्के सरकारी नोकऱया महिलांना दिल्या जातील, असे आश्वासन काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या प्रियांका गांधी यांनी मोरपिर्ला, केपे येथे अनुसूचित जमातींतील महिलांशी संवाद साधल्यानंतर बोलताना दिले. आज महागाई एवढी वाढली असून महिलांना घर चालवणे कठीण बनले आहे. यात गॅस सिलिंडर व इतर सर्व दर वाढल्याने सर्वांकरिता ती मोठी डोकेदुखी बनली आहे. महिला आपल्या मुलांना शिकवतात, पण त्यांना रोजगार मिळत नाही. त्यामुळे जे रोजगार देईल व गावच्या समस्या सोडवेल असे सरकार निवडून आणले पाहिजे, असे त्या म्हणाल्या.
यावेळी काँग्रेस नेते पी. चिदंबरम, दिनेश राव, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, आलेक्स सिकेरा, एल्टन डिकॉस्ता व इतर हजर होते. पुढे गांधी म्हणाल्या की, सामान्य जनतेचा विचार करणारा एकमेव पक्ष म्हणजे काँग्रेस असून त्यांनी सदैव जनतेचा विचार, विकास व हित डोळय़ांसमोर ठेऊन कार्य केले आहे. जेव्हा गोवा महाराष्ट्रात विलीन करण्याचा प्रस्ताव होता तेव्हा लोकांनी म्हटले की, गोवा वेगळे राज्य असले पाहिजे. या भावनेचा विचार करून वेगळे राज्य केले. लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हाच जनतेचा विकास होत असतो, असे त्यांनी सांगितले.
भाजप सरकारकडून जनतेचे शोषण
आज गोव्यात अनेक नवीन पक्ष येत असून त्यांनी आपापल्या राज्यात कोणता विकास केला आहे तो पहिल्यांदा पाहणे गरजेचे आहे. दिल्लीत प्रदूषणसारख्या समस्या आहेत. मतदान करताना पहिल्यांदा जनतेने आपला परिवार, प्रदेश यांचा विचार करावा. गोव्यात असे सरकार हवे की, जे लोकांकरिता काम करेल. गोव्यातील भाजप सरकारने जनतेचे शोषण केले असून येथील पर्यावरणाची चिंता न करता आपल्या उद्योगपती मित्रांकरिता व त्यांच्यासाठी सुविधा निर्माण करण्याकरिता हे सरकार काम करत आहे, अशी टीका त्यांनी केली.
भाजप सरकारकडून मोजक्याच उद्योगपतींकरिता कार्य
भाजप सरकार जनतेकरिता काम करत नसून काही मोजक्मयाच उद्योगपतींकरिता काम करत आहे. या ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची समस्या, खेळण्यासाठी मैदानाचा अभाव, रस्ते अशा अनेक समस्या असून सरकारने त्या सोडवल्या पाहिजेत. जर काँग्रेसचे सरकार स्थापना झाले, तर या सर्व समस्या साडविल्या जातील. हे प्रश्न सोडविणे सरकारचे कर्तव्य आहे. जेव्हा आपण चांगले सरकार निवडाल तेव्हाच आपल्याला चांगल्या सुविधा मिळतील, असे गांधी पुढे म्हणाल्या.
गोव्यातील भाजप सरकार फक्त स्वतःच्या स्वार्थाकरिता काम करत असून कोणत्याही स्थितीत पुन्हा सत्ता त्यांना हवी आहे. ग्रामीण भागांतील शेतकरी, काजू बागायतदार यांना कोणत्याच सुविधा मिळत नसून त्यांना सर्व सुविधा मिळाल्या पाहिजेत, असे त्या म्हणाल्या. एल्टन डिकॉस्ता यांनी आभार मानले.
लोकनृत्यात सहभाग, महिलांसमवेत जेवण
यावेळी प्रियांका गांधी यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यांनी कुणबी समाजातील महिला ज्या पारंपरिक प्रकारे साडी नेसतात त्या प्रकारे साडी परिधान करून लोकांशी संवाद साधला. यावेळी लोकनृत्य सादर करण्यात आले असता त्यातही त्या सहभागी झाल्या. तसेच आदिवासी समाजातील महिलांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर तेथेच जमिनीवर बसून महिलांसोबत त्यांनी जेवणही घेतले.
स्थानिक पत्रकारांना डावलण्याचा प्रकार
यावेळी तेथे वार्तांकनासाठी गेलेल्या स्थानिक पत्रकारांना एका बाजूला ठेऊन दिल्लीतून आलेल्या मीडियाला हवी तशी कव्हरेज करण्याची सूट दिली गेली. मात्र स्थानिक पत्रकारांना अडवण्यात आले. याबद्दल जाब विचारण्यात आला असता काँगेस नेते चिदंबरम व प्रियांका गांधी यांचे अधिकारी यांनी पत्रकारांकडे वाद घातला. त्यामुळे सर्व स्थानिक पत्रकारांनी तेथून कार्यक्रम अर्ध्यावरच सोडून येण्याचा निर्णय घेतल्यानंतर दिगंबर कामत, एल्टन डिकॉस्ता यांनी व इतर नेत्यांनी पत्रकारांची समजूत काढल्याने पत्रकार कार्यक्रमात थांबले.