वर्षभरात केवळ वीस-पंचवीस दिवस काम : ग्रा.पं.पीडीओ-अध्यक्षांच्या दुर्लक्षामुळे रोहयो कामगारांकडून संतप्त प्रतिक्रिया
वार्ताहर /कडोली
रोहयो योजनेतून काम देण्यास वारंवार टाळाटाळ करीत असल्यामुळे संतप्त रोहयो कामगारांनी केदनूर येथील ग्राम पंचायतीला टाळे ठोकून ठिय्या आंदोलन केले.
केदनूर ग्राम पंचायत क्षेत्रात एकूण 500 रोहयो कामगार असून त्यांना कामे दिली जात नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य कामगारांवर अन्याय होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने सर्वसामान्य कुटुंबांचा उदरनिर्वाह चालावा, यासाठी रोहयोच्या कामांना प्रोत्साहन दिले आहे. या कामगारांना वर्षभरात 150 दिवस काम देण्यात यावे, असे सुचविले असताना केदनूर ग्रा. पं. चे पीडीओ आणि अध्यक्षांनी याकडे दुर्लक्ष केल्याने रोहयो कामगारांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. आज काम देतो, उद्या काम देतो, असे सांगून रोहयो कामगारांना ताटकळत ठेवण्यात आले आहे. गेल्या वर्षभरात केवळ वीस ते पंचवीस दिवस काम देण्यात आले आहे.
ग्रा.पं.पीडीओ आणि अध्यक्षांच्या नाकर्तेपणामुळे कंटाळून अखेर रोहयो कामगारांनी ठिय्या आंदोलनाचे अस्त्र उपसून संताप व्यक्त करून ग्राम पंचायतीला टाळे ठोकले. यावेळी या ठिकाणी ग्रा. पं. सदस्य किंवा पीडीओ फिरकले नाहीत. परंतु या आंदोलनाची दखल घेऊन ता. पं. अधिकारी राजेंद्र मोरबद यांनी ग्रा. पं. ला भेट दिल्यानंतर सर्व ग्रा. पं. सदस्य, पीडीओ लक्ष्मी कांबळे दाखल झाले. यावेळी रोहयो कामगारांनी ग्रा. पं. ने काम न दिल्याच्या निषेधार्थ घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता. या आंदोलनात मोठय़ा संख्येने रोहयो कामगार सहभागी झाल्याने संबंधित अधिकाऱयांना धक्का बसला होता.
तातडीने काम देण्याचा आदेश
या आंदोलनाची दखल घेऊन तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी राजेंद्र मोरबद यांनी मंगळवारी ग्रा. पं. अध्यक्ष, सदस्य, अधिकाऱयांची बैठक बोलाविली असून या बैठकीत रोहयो कामगारांना काम देण्याविषयी रुपरेषा ठरविण्यात येणार आहे.
बुधवार दि. 26 जानेवारीपासून सर्वांना काम देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. येत्या दोन महिन्यात संपूर्ण साठ दिवस रोहयो कामगारांना काम देण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकाऱयांच्या या आश्वासनानंतर रोहयो कामगारांनी आंदोलन मागे घेतले.