कंग्राळी खुर्द-अलतगा ग्रामस्थांचे जिल्हा-तालुका पंचायतला निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
अलतगा गावातील श्री लक्ष्मी यात्रा 2023 मध्ये होणार आहे. त्यामुळे सध्या सर्व कामे पूर्ण करण्याची गरज असून रस्ता, गटारी व अन्य सुविधा देण्यांबाबत अधिकाऱयांनी तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. उद्योग खात्री योजनेतून 3 कोटींचा आराखडा तयार करून देण्यात आला आहे. त्याला तातडीने मंजुरी देण्याची मागणी होत आहे.
सध्या कंग्राळी खुर्द ग्राम पंचायतमध्ये तलाव निर्मितीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. याचबरोबर मैदान आणि स्मशानभूमीही उभारण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असेही निवेदनात म्हटले आहे. उद्योग खात्री योजनेंतून नागरिकांना काम मिळावे यासाठी कंग्राळी खुर्द ग्राम पंचायतमधून तालुका पंचायतकडे आराखडा पाठवून देण्यात आला आहे. तो आराखडा तातडीने मंजूर करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी कंग्राळी खुर्द व अलतगा ग्रामस्थांनी केली आहे.
बेळगाव तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी राजेश दनवाडकर यांनी याबाबत गांभीर्याने घेऊन हा आराखडा तातडीने मंजूर करण्यासाठी प्रयत्न करावेत. उद्योग खात्री योजनेतून कंग्राळी खुर्द येथे अनेक कामे रखडली आहेत. अनेक नाले स्वच्छ करण्याची गरज आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळेच गावातील अनेक विकासकामे राबविण्यासाठी सध्या आपण तालुका पंचायतकडे आराखडा तयार करून दिला आहे. या आराखडय़ात सुमारे 3 कोटींची कामे नमूद करण्यात आली आहेत. मात्र त्याला अजूनही मंजुरी मिळाली नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. जर हा आराखडा तातडीने मंजूर झाला तर गावच्या विकासाला चालना मिळणार आहे. याचबरोबर गावातील कामगारांच्या कामाचा प्रश्नही मार्गी लागणार आहे. तेंव्हा हा आराखडा तातडीने मंजूर करून जिल्हा पंचायतीकडे वर्ग करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. याबाबत आपण ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनाही सांगितले आहे. याचबरोबर लवकरच अलतगा ग्रामस्थांची श्री महालक्ष्मी यात्रा होणार आहे. सर्व सुविधा मिळण्यासाठी आतापासून प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. मार्च किंवा एप्रिल 2023 मध्ये ही यात्रा होणार आहे. तेंव्हा तातडीने सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. सदर निवेदन तालुका पंचायतचे कार्यकारी अधिकारी राजेश दनवाडकर यांना देण्यात आले. यावेळी केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील, ग्राम पंचायत अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, उपाध्यक्षा ज्योती पाटील, ग्राम पंचायत सदस्य चेतक कांबळे, विनायक कम्मार, यशोधन तुळसकर, प्रशांत पाटील, कमला पाटील, लता पाटील, सुनिता जाधव, भाग्यश्री गौंडवाडकर, मीना मुतगेकर, देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत धुडूम, उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सेपेटरी कल्लाप्पा चौगुले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.